नवी दिल्ली – ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. पत्रकारांशी बोलताना बॅनर्जी यांनी, प्रदेशातून राहून निवडणुका जिंकता येत नाहीत असा अप्रत्यक्ष टोला राहुल गांधींना लगावला होता. यानंतर काँग्रेस नेत्यांनी बॅनर्जी यांच्यावर टीका करताना, त्यांनी केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा आपल्या मागे लागू नये यासाठी असे विधान करत असल्याचा आरोप लगावला. तर काही काँग्रेस नेत्यांनी केवळ एका राज्यापुरता मर्यादित पक्ष भाजपविरोधात सक्षम ठरणार नाही असे सांगत काँग्रेसचे महत्व अधोरेखित केले.
अशातच आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ या वादात उडी घेतली आहे. याबाबत भाष्य करताना किशोर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर, काँग्रेस गेल्या १० वर्षांत ९० टक्के निवडणुका हरळी असल्याचा आरसा दाखवला आहे. तसेच विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार काँग्रेसकडे नाही असे देखील त्यांनी म्हंटले आहे.
प्रशांत किशोर यांचे ट्विट
“सक्षम विरोधक म्हणून काँग्रेस ज्या विचाराचे व विस्ताराचे प्रतिनिधित्व करते ते महत्वपूर्ण आहे. विशेषतः गेल्या १० वर्षांमध्ये ९० टक्के निवडणुका हरल्यानंतर काँग्रेस पक्षाकडे विरोधकांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार उरत नाही. त्यामुळे विरोधकांचे नेतृत्व निवडताना लोकशाही मूल्यांचा वापर करण्यात यावा.” असं ट्विट प्रशांत किशोर यांनी केलं आहे.
गुलाम नबी आझाद यांचे वक्तव्य
काँग्रेस एकट्याच्या बळावर लोकसभेच्या ३०० जागा जिंकू शकत नाही असे वक्तव्य पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केले. त्यांच्या वक्तव्यातून विरोधकांची आघाडी होणं काँग्रेसची देखील गरज असल्याचेच अधोरेखित होत.
ममता बॅनर्जी ऍक्टिव्ह मोडमध्ये
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर राष्ट्रीय राजकारणाकडे वळताना दिसतायेत. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी ममता यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्या व्हीलचेअरवरून प्रचार करत होत्या. त्यावेळी त्यांनी, एका पायावर बंगाल तर दोन्ही पायावर देश जिंकणार असल्याचं म्हणाल्या होत्या. बंगालमध्ये मोठा विजय प्राप्त केल्यानंतर आता त्या राष्ट्रीय राजकारणाकडे वळल्या असून विरोधकांची मोट बांधण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.