सोमेश्वरनगर -विनाकारण गावात रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना काठीचा पोलिसांनी चोप सुरू केल्याने सोमेश्वरनगर परिसरात संचारबंदीचा खरा नियम लागू केल्याचे मंगळवारी (दि. 24) सकाळ पासून दिसून येत होते.
सोमेश्वरनगर परिसरात रविवारी जनता कर्फ्यूला दिलेल्या प्रतिसादानंतर सोमवारी (दि. 23) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदीचा आदेश जारी केला. यानंतरही सोमेश्वरनगरमध्ये बऱ्याच ठिकाणी चारचाकी, दुचाकींचा वावर जास्त होताना दिसत होता; परंतु दुपारी नंतर वाहने व नागरिकांची रस्त्यावर गर्दी वाढण्याची शक्यता होत असल्याने वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ लांडे व कर्मचाऱ्यांनी विनाकारण फिरणारी वाहने अडवून काही वाहनचालकांना तंबी दिली व काहींना लाठीचा चोप दिल्याने वाहनचालकांमध्ये धांदल उडाली होती.
पोलिसांचा चोप सुरू असल्याचे पाहून पाठीमागून व समोरच्या बाजूने येणारी वाहने माघारी फिरून जात होती. या भागात काही नागरिक, लहान मुलेही विनाकारण दुचाकीवरून लहान मुलांना घेऊन फिरत असताना दिसत होते.