पुणे – मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे व्हावे, या मागणीसाठी पुणे बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना रविवारी निवेदन दिले. त्यावेळी केंद्रीय कायदा मंत्र्याशी चर्चा करून याबाबत लवकरात लवकर निर्णय होण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन जावडेकर यांनी दिले आहे.
त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, श्याम सातपुते, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. श्रीकांत आगस्ते, ऍड. उपाध्यक्ष रवी लाढाणे, सचिव ऍड. केदार शिंदे, ऍड. मनीष मगर, खजिनदार ऍड. सचिनकुमार गेलडा, कार्यकारिणी सदस्य ऍड. तुषार कुऱ्हाडे, ऍड. अर्चना गायकवाड, ज्येष्ठ विधिज्ञ विजय सावंत आदी उपस्थित होते.
पुणे आणि औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू व्हावे, असा ठराव 1978 मध्ये विधी मंडळात मंजुर झाला आहे. त्यानुसार 1981 मध्ये औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू झाले. मात्र, ठरावाला 40 वर्षे उलटून गेली. तरीही अद्याप पुणे येथे खंडपीठ सुरू झालेले नाही. या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली.