मुंबई : राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती या एकत्र आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. पुण्यातील खडकवासला मतदार संघातील कोल्हेवाडी येथे वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडली त्यावेळी त्यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेखदेखील केला असल्याचे समोर आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका करत असताना आंबेडकर यांनी, “बीबीसीची डॉक्यूमेंट्रीवर केंद्र सरकारने बंदी घातली. गुजरात दंगलीनंतर दोन विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी हा दंगलखोर आहे का? याचा विचार केला नाही. केंद्रातही दोनदा पंतप्रधान केलं. चोराच्या मनात चांदणं जसं असतं, तसं मोदीच्या मनामध्ये भीती आहे की, माझं २००४ चं चारित्र्य पुन्हा लोकांसमोर येऊ नये, म्हणून त्यांनी बीबीसीच्या वृत्तपटावर बंदी आणली. जे जे सत्य दाखविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे.” असा आरोप यावेळी केला.
सभेला संबोधित करत असताना प्रकाश आंबेडकर यांनी,“लोकसभेत बहुमत असेपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेतच, ते आम्हाला मान्यच आहे. पण आज ईडी, सीबीआयचा धाक आहे. तुरुंगात जाण्याचा धाक वाटतो म्हणूनच सर्व मोदींना हात जोडतात. त्यांची प्रशंसा करतात. अनेक विशेषणे त्यांना देतात, पण मनातल्या मनात हे कधी जातंय, याचीच सर्व वाट बघत आहेत. मला काही भाजपचे लोक म्हणाले, आम्ही २०२४ मध्ये परत येऊ. मी त्यांना म्हणालो २०२४ च काय, आम्हाला तुरुंगात टाकलं, तर तुम्ही २०२९ मध्ये देखील परत याल. कुणी विरोधकच शिल्लकच ठेवला नाही तर तुम्हाला विरोध करणार कोण?”, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
अदाणी समूहाने केलेल्या घोटाळ्यामुळे ४३ हजार कोटींचे नुकसान झाले. भाजपाचे सरकार अदाणी समूहाला एलआयसीचे ७८ हजार कोटी द्यायला निघालेले आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला. यावेळी त्यांनी गौतम अदाणी यांची धंदा करण्याची पद्धत कशी आहे, हे एका उदाहरणातून सांगितले. ते म्हणाले, “आपण हॉटेलमध्ये गेल्यावर आपण रुम बुक करतो, तिथे जेवतो. अदाणीची धंदा करण्याची पद्धत अशी की, तो हॉटेलमध्ये जेवतो पण हॉटेलच्या रुमचे पैसे देत नाही.
हॉटेल मालकाला सांगतो, मी आठ दिवसांनी येऊन पुन्हा रुम बुक करेल आणि तुमचे सगळे पैसे देईल. आठ दिवसांनी येऊन यावेळी रुमचे पैसे देतो आणि जेवणाचे बिल शिल्लक ठेवून जातो. हेच अदाणीने बँकेच्या बाबतीत केले आहे. एका बँकेकडून कर्ज घ्यायचे आणि दुसऱ्या बँकेला द्यायचे परत तिसऱ्या बँकेतून कर्ज काढायचे. या सर्व प्रकरणाचा आता निकाल लागला आहे. पण अदाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मांडीवर बसलेले असल्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार नाही. उलट त्याला एलआयसीचे ७८ हजार कोटी दिले जातील, असा आरोपदेखील प्रकाश आंबेडकर यांनी केला.