पुणे – कोल्हापुरात बुधवारी मराठा आरक्षणाबाबत मूक आंदोलन झाले होते. याच पार्श्वभूमीवर आज, राज्याचे मुख्यमंत्री व खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यादरम्यान एक महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले असून आज सायंकाळी ५ वाजता ही भेट होणार आहे.
या भेटीपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी, ही भेट संभाजीराजेंसाठी ‘ट्रॅप’ असणार असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
या भेटीबाबत बोलताना, “मला यात राजकारण दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना बोलावणे हा ट्रॅप वाटतो. राणे समिती, गायकवाड कमिशन या दोन्हीमध्ये जाणीवपूर्वक सुप्रीम कोर्टाला चॅलेंज देण्याचा भाग होता. भाजपने ही जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाला साईड ट्रॅक केले. संभाजीराजेंच्या नावावर मराठा आरक्षणाचे खापर फोडण्याचा प्रयत्न होतोय” असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
संभाजीराजेंच्या मागण्या मान्य करण्याबाबत सरकार सकारात्मक?
मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे यांच्यासह राज्यभरातील समन्वयक सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या भेटीचे निमंत्रण खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच दिले असल्याने मराठा समाजासाठी संभाजीराजेंनी केलेल्या मागण्या मान्य करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची चर्चा आहे. मराठा समाजाचे आंदोलन चिघळू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यादृष्टीने आजची बैठक महत्वाची मानली जात आहे.