मुंबई – राज्य सरकार सातत्याने केंद्राच्या निर्णयाला छेद देणारी भूमिका घेत आहे. घटनेनुसार राज्याला केद्र सरकारच्या विरोधात जाता येत नाही. मात्र, महाराष्ट्रात तसेच घडत आहे. त्यातून एक वेगळाच संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे डिसेंबर महिना सुरू होण्यापुर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं भाकित वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्य सरकार सातत्याने केंद्र सरकारच्या विरोधी भूमिका घेत आहे. केंद्राचे कायदे नाकारले जात आहेत. देशात सध्या अनलाॅक प्रक्रिया सुरू असून अनेक निर्बंध शिथील केले जात आहेत.
केंद्र सरकारने मंदिरं खुली करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. सामान्य जनतेला आजही लोकलची प्रतीक्षा आहे. असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर हे सातत्याने लाॅकडाऊन विरोधी भूमिका घेतात. लाॅकडाऊन हटवण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारे आंदोलनेही केली. सलून बंद असताना ती उघडण्यात यावीत यासाठी अकोला येथे केस कापून घेत अभिनव आदोलन केले होते. तसेच मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथील आंदोलनातही सहभागी झाले होते.