मुंबई – मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर पोलीस भरती करू नये, नोकर भरतीसाठीच्या “एमपीएससी’सारख्या परीक्षा घेऊ नयेत, अशी मागणी मराठा संघटनांनी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने “एमपीएससी’ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
राज्य सरकारच्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. “एमपीएससी’ परीक्षांवर तोडगा काढता आला असता. मात्र ही परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित 85 टक्के जनतेचे काय? असा सवाल आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
एका जातीचं राजकारण चालणार नाही. मराठा आंदोलनकर्त्यांना सरकारने विश्वास दिला नाही. महाविकास आघाडीचे सरकार अतिरेक करत आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या दिशानिर्देशाची अंमलबजावणी करत नाही. वारकरी संप्रदायाने सरकारच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे महाराष्ट्रमध्ये मंदिरे उघडी केली जात नाही. सरकार वारकऱ्यांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहे असे दिसते आहे, असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला.