कोल्हापूर – मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी करकरेंना मारणारे दहशतवादी बोट घेऊन चार दिवस पोरबंदर मध्ये होते. त्या बोटीच्या मालकाला तत्कालीन गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी का पकडले नाही.? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना केला. शिवाय नरेंद्र मोदी हे दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याची टीका त्यांनी केलीय. मोदी ज्या अर्थी साध्वीच्या वाक्याचे खंडन करत नाहीत त्या अर्थी हे सगळे स्पष्ट होत असून जे पेरले ते भोपाळ मध्ये उगवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि साध्वी प्रज्ञासिंग प्रकरणावरून मोदींवर चांगलीच तोफ डागलीय.
वंचित बहुजन विकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. अरुणा माळी यांच्या प्रचारार्थ गांधी मैदान येथे जाहीर सभा झाली. यावेळी सभेत अॅड. आंबेडकर बोलत होते.
ते म्हणाले, शहीद हेमंत करकरे यांना साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने शाप दिला असल्याचे म्हटले आहे. मग त्या शापाची गोळी कुठली व कोणाची होती, हे मला सांगावे असे अॅड. आंबेडकर यांनी म्हंटलंय. भाषणात रोज बलिदान दिलेल्यांचे पंतप्रधान मोदी उल्लेख करतात. मग जर प्रज्ञासिंहला उमेदवारी दिली असेल, तर पंतप्रधानांची भूमिका नेमकी कोणती, हे स्पष्ट होते.
भोपाळमधील प्रज्ञासिंह या भाजपच्या उमेदवाराच्या विधानाचे मोदी यांनी कुठेही खंडन केलेले दिसत नाही. आरएसएसकडे बंदुका आहेत. त्या सगळ्या बेकायदेशीर आहेत. जे काही त्यांनी पेरले, ते भोपाळच्या रूपाने उगवत असल्याचे दिसू लागले आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा येथील मोठ्या संख्येने तरुण लष्करात आहेत. ही मंडळी भाजपला मतदान करणार नाहीत. त्यामुळे मतदारांनी शांतता हवी की अशांतता, हे ठरवावे असेही ते म्हणाले.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/671427763314519/