मुंबई – छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा अभिनेत्री ‘प्राजक्ता माळी’ने आपल्या अभिनयाची मोहिनी दोन्हीकडे घातली आहे. प्राजक्ताने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.
प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केले आहे. मात्र, तिने या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चित्रपटगृह 100 टक्के आसनक्षमतेने सुरु करा, यासाठी कळकळीची विनंती केल्याचं दिसून येत आहे. सध्या प्राजक्ताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, अनेकांनी या व्हिडिओवर आपली मतं मांडण्यास सुरुवात केली आहे.
व्हिडिओत प्राजक्ता माळी म्हणते की….., “लहान तोंडी मोठा घास…पण आता बोलायला हवे. सर्व मराठी रसिक सुज्ञ आहेत, करोना नियमांचं पालन करून ते कलाकृतींचा आस्वाद घेतील अशी आम्हांला खात्री वाटते. तरी आमची विनंती विचारात घ्यावी. असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.
View this post on Instagram
“नमस्कार, नुकतंच आमच्या पावनखिंड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सर्वच मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. 18 फेब्रुवारीला पावनखिंड चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याही चित्रपटावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतील. प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. पण आता सरकारलाच विनंती आहे की, करोनाचा जोर ओसरला आहे. सर्वच नियम बऱ्यापैकी शिथील करण्यात आले आहेत. फक्त चित्रपटगृह आणि नाट्यगृहच 50 टक्के आसनक्षमतेने सुरु आहेत, असे का?
त्यामुळे आम्हा सर्वांची अशी नम्र विनंती आहे की शिवजयंती तोंडावर आहे. त्या निमित्ताने सर्व शिवप्रेमींना, चित्रपट निर्मात्यांना, सर्व रंगकर्मींना 100 टक्के आसनक्षमतेने सर्व चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु झाली आहेत, ही आनंदाची बातमी द्याल. आम्ही आशा करतोय की 100 टक्के आसनक्षमतेने चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु व्हावीत. त्याचा आम्हा सर्व कलाकारांना आणि चित्रपट निर्मात्यांना खरच खूप फायदा होईल. ही सरकारला नम्र विनंती. असं प्राजक्ता या व्हिडिओत म्हणाली आहे.
दरम्यान,’पावनखिंड’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरने केले असून चित्रपटात छत्रपतींच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर झळकणार आहे. चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा पहायला मिळणार आहे. तसेच मराठी कलाकारांचा भलामोठा फौजफाटा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपटाचा अनुभव घेता येणार आहे.