नाशिक – गोदावरी नदी स्वच्छ व प्रदुषणमुक्त राखत तिचे पावित्र्य राखल्याने चंद्रकिशोर पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांचे उत्तम वर्णन करता येईल. याबाबत आयएफएस अधिकारी स्वीता बोड्डू यांनी केलेल्या ट्विटनंतर पाटील चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल चंद्रकिशोर पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नाशिकच्या गोदावरी नदीवरील पुलावर एक माणूस दिवसभर एक शिटी घेऊन उभा असतो. या पुलावरून कोण नदीपात्रात कचरा, निर्माल्य टाकताना दिसताच तो शिट्टी वाजवून त्यांना रोखतो. तसेच त्यांच्याकडील पिशवी व निर्माल्य स्वतःकडे ठेवत तो निस्वार्थपणे काम करत आहे.
इंदिरानगर येथील नदीकाठच्या सोसायटीत राहत असलेले चंद्रकिशोर पाटील म्हणाले, मी सकाळपासून रात्री 11 वाजेपर्यंत नदीकाठी उभी राहून शिट्टी वाजवत लोकांना “नदीत कचरा टाकू नका’ असे सांगत त्यांना सावध करत असतो. अनेक वेळा काही जण माझ्याशी उद्धटपणे वागतात, काहीजण वाद घालतात. तरीही मी त्यांचा पाठपुरावा करतो.
त्यांना नदीत निर्माल्य टाकण्यापासून रोखत होणारे जलप्रदुषण आणि अस्वच्छता याबाबत मार्गदर्शन करतो. तसेच यामुळे निर्माण होणारी रोगराई आणि आरोग्याचे प्रश्न याचीही माहिती देत त्यांच्याकडील निर्माल्य स्वतःकडे ठेवून घेतो. त्यानंतर दिवसभर साचलेला कचरा गोळा करून पालिकडे तो डंप करण्यासाठी जमा करतो.
गेल्या पाच वर्षांपासून मी नियमीतपणे हे काम करत आहे. आता लोकांमध्येही जनजागृती झाली असून अनेक जण आता नदीत कचरा टाकत नसल्याने मी समाधानी आहे. हे कार्य मी असेच चालू ठेवणार असल्याचेही चंद्रकिशोर पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, चंद्रकिशोर पाटील यांच्या कार्याचे सोशल मीडियावरून कौतुक होत आहे. या संदर्भातील पोस्टवर असंख्य टिप्पण्यांसह 800हून अधिक जणांनी लाईकस् केले आहेत. याबाबत एकाने लिहिले की, पाटील यांच्या प्रयत्नांचे कौतुक शब्दात करता येउ शकत नाही. ते पर्यावरणाचे नायक आहेत. तर अन्य एकाने ट्विट केले की, “समाजाचे खरे नायक’. अशी माणसे असल्याचा अभिमान वाटतो आणि आनंदी आहे. त्यांच्या कार्याला सलाम.