नवी दिल्ली – प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेवरून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोफत एलपीजी गॅस जोडणी झालेल्या चार राज्यांतील सुमारे 85 टक्के लाभार्थी अजूनही चुलीवर स्वयंपाक बनवत आहेत. बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये उज्ज्वला योजनेचे 85 टक्के लाभार्थी अजूनही चुलीवर स्वयंपाक करत आहेत. रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर कॅम्प्समेंट इकॉनॉमिक्सच्या (आरआयसीई) अहवालात ही बाब समोर आली आहे.
यामागे आर्थिक कारणांबरोबर लैंगिक असमानता असल्याचेही समोर आले आहे. चुलीवर स्वंयपाक करताना त्यातून निघणाऱ्या धुरामुळे नवजात बालकांचा मृत्यू, बालकांच्या वाढीत अडचणी त्याचबरोबर ह्दय आणि फुप्फुसाच्या आजारांची भीती असते. हा सर्वे 2018 च्या अखेरीस करण्यात आला आहे. यामध्ये चार राज्यातील 11 जिल्ह्यातील 1550 कुटुंबीयांचे नमुने घेण्यात आले. या परिवारातील 98 टक्क्यांहून अधिक घरात चूल आढळून आली होती.
उज्ज्वला योजनेचे लाभार्थी अति गरीब असल्याकारणाने त्यांना सिलिंडर संपल्यानंतर तो पुन्हा घेता येत नाही, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. त्याचबरोबर लैंगिक असमानतेची बाबही समोर आली आहे. सुमारे 70 टक्के कुटुंबीयांना चुलीसाठी लागणाऱ्या सरपणावर काहीच खर्च करावा लागत नाही, असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सिलिंडरच्या तुलनेत त्यांना चूल स्वस्त पडते. महिला गोवऱ्या थापतात. बहुतांश लोकांना गॅसवर स्वंयपाक बनवणे सोपे वाटते. पण चुलीवर स्वंयपाक चांगला शिजतो असे महिलांचा गैरसमज असल्याचे बोलले जाते.