पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विस्तारत आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ आणि तुलनेत कमी पडणाऱ्या सुविधा अशी परिस्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. नागरिकांना किमान मूलभूत नागरी सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी विषयांशी संबंधित छोटे-छोटे प्रश्न सुटावेत, अशीच सर्वसामान्यांची माफक अपेक्षा आहे. या समस्या मांडण्यासाठी आम्ही आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.
चेंबर तुटल्याने अपघाताचा धोका
वाल्हेकरवाडी – येथील पोलीस चौकीच्या बाजूला भुयारी गटाराचे चेंबर तुटल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. याशिवाय छोटी वाहने वर्दळ अधिक असल्याने त्याचा चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. चेंबर तुटीमुळे या भागात अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. महत्वाचे म्हणजे वाल्हेकरवाडी येथील पोलीस चौकीच्या बाजूलाच हे चेंबर आहे. तरी सुद्धा येथील चेंबरची दखल घेतली जात नाही. पोलीस चौकी जवळच असल्याने येथे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. तरी येथील चेंबरची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
– भैरवनाथ गोडगे, वाल्हेकरवाडी
चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये हजारो वाहनांचा “खच’
पिंपरी – चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये अपघात, चोरी अशा विविध कारणाने जप्त केलेल्या वाहनांचा खच पडला आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, पोलीस ठाण्याच्या आवारात दुचाकी वाहनांचा ढीग पडला आहे. ही वाहने आता राष्ट्रीय संपतीचा नाश आहे, याकडे लक्ष वेधले पाहिजे. याबाबत पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर प्रक्रिया होऊन ही जप्त करण्यात आलेली वाहने वापरास यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
विरूद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना पायबंद घाला
पिंपरी – खराळवाडी येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गवरुन हिंदुस्थान ऍन्टिबायोटिक्स (एच. ए) कॉलनी ते पेट्रोल पंप दरम्यान सर्रास वाहने विरूद्ध दिशेने चालविली जातात. याकडे वाहतूक पोलीसांने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. याच दरम्यान मंदिर, टपाल कार्यालय, एटीएम व बॅंक आहेत. त्यामुळे येथील रस्त्यावर नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यात महामार्गावर विरूद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना अपघाचा धोका निर्माण झाला आहे. तरी याबाबत पिंपरी वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
– काशिनाथ बागुल, ज्येष्ठ नागरिक, पिंपरी.