पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विस्तारत आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ आणि तुलनेत कमी पडणाऱ्या सुविधा अशी परिस्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. नागरिकांना किमान मूलभूत नागरी सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी विषयांशी संबंधित छोटे-छोटे प्रश्न सुटावेत, अशीच सर्वसामान्यांची माफक अपेक्षा आहे. या समस्या मांडण्यासाठी आम्ही आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.
पथदिव्यांवरील वेली काढण्याची मागणी
चिंचवड – महावितरण आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ठिकठिकाणी विद्युत रोहित्र आणि पथदिव्यांवर वेली वाढल्या आहेत. सुकलेल्या वेलींमुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यत नाकारता येत नाही. विद्युत रोहित्र किंवा विद्युत उपकरणे असलेल्या इतर ठिकाणी शॉर्टसर्किट होण्याचा धोका असतो. त्यामुळे महावितरणच्या उपकरणाच्या आसपास कचरा टाकू नये, असे आवाहन महावितरणकडून केले जाते. एकीकडे नागरिकांना आवाहन करणारे महावितरण आणि महापालिका आपल्या उपकरणांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे वेळोवेळी दिसून येते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे चिंचवडगावातील तानाजीनगर परिसरात तालेरा रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या शेजारील खांबावर वेली अगदी टोकापर्यंत गेली आहे. सध्या ही वेली सुकून गेली आहे. भविष्यात या ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्यास सुकलेल्या वेलीला आग लागून दुर्घटनाही घडू शकते. अशीच स्थिती वाल्हेकरवाडी, मोरेवस्ती, चिखली, व शहराच्या इतर भागांतही आहे. यामुळे संबंधित यंत्रणांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पदपथ खोदून ठेवल्याने पादचाऱ्यांची होतेय गैरसोय, प्रशासनाचे दुर्लक्ष
पिंपरी – पिंपरी वाघेरे गावातील यशवंतराव चव्हाण स्टेडियमच्या मागील बाजूच्या व्यापारी संकुल गाळ्याच्या समोरील पदपथ गेल्या तीन-चार महिन्यांपासून खोदून ठेवला आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या पदचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांच्या जिविताला अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित बाबीची महापालिका प्रशासनाने दखल घेऊन पदपथाचे कामकाज त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
– संजय गायखे, पिंपरी, वाघेरेगाव
उघड्या केबलमुळे अपघाताचा धोका
पिंपरी -पिंपळे सौदागर येथील शिवार चौकाकडून औंधकडे जाताना जगताप डेअरी येथे रस्त्याच्या वळणावरच वीजवाहिनी केबल उगडी असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या रस्त्याने ये-जा करणारे वाहनचालक व पादचाऱ्यांना अपघात होऊ शकतो. केबल रस्त्यात असल्याने ये-जा करताना लक्षात न आल्यास पायात अडकून पादचाऱ्याला अपघात होऊ शकतो. येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, विद्युत वाहिनीची केबल भूमिगत न केल्याने येथून ये-जा करणाऱ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरी याबाबत महापालिका प्रशासनाने व विद्युत महामंडळाने लक्ष घालून येथील विद्युत वाहिनी भूमिगत करण्याची मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
– एस. एन. कुंभार