पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विस्तारत आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ आणि तुलनेत कमी पडणाऱ्या सुविधा अशी परिस्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. नागरिकांना किमान मूलभूत नागरी सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी विषयांशी संबंधित छोटे-छोटे प्रश्न सुटावेत, अशीच सर्वसामान्यांची माफक अपेक्षा आहे. या समस्या मांडण्यासाठी आम्ही आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.
पथदिवा वेलींनी झाकोळला
पिंपरी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पिंपरी स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर थिसेनक्रुप कंपनीजवळच्या पथदिव्यांवर वेली वाढल्या आहेत. वेली वाढल्याने पथदिवे झाकाळून गेले आहेत. त्यामुळे रात्री पथदिवे लावले तरी या ठिकाणी अंधारच असतो. लहान मुलांना, महिलांना व पादचाऱ्यांना अंधारातून जीव मुठीत धरून जावे लागत आहे. स्थानिकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. तरी याची त्वरित दखल घेऊन महापालिका प्रशासनाने वेली कढून नागरिकांना भेडसावत असलेली समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.
पदपथाअभावी पादचाऱ्यांना अपघाताचा धोका
पिंपळे सौदागर – येथील कोकणे चौक ते गोविंद यशदा रस्त्यावर पदपथ नसल्याने पादचाऱ्यांच्या जिवाला अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व पादचाऱ्यांना मुख्य रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे त्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पदपथाअभावी पादचाऱ्यांना चालणे कठीण
झाले आहे.
दोन महिन्यांपासून पदपथ ठेवले खोदून
पिंपळे सौदागर – गावठाण परिसरात मागील दोन महिन्यांपासून पदपथ खोदून ठेवला आहे. ज्या कामासाठी पदपथ खोदला आहे ते काम पूर्ण होऊन दोन महिने झाले तरी पदपथाचे काम संबंधित ठेकेदाराने मार्गी लागले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी पदपथावर खड्डे तसेच आहेत तर काही ठिकाणी पदपथावर राडारोडा पडून आहे. त्यामुळे वर्दळीच्या रस्त्यावरून नागरिक ये-जा करीत आहेत. सकाळी व सायंकाळी या मार्गावर अनेक नागरिक फिरावयास येत असतात. संभाव्य धोका लक्षात घेऊन पदपथ सुरक्षित करण्यात यावेत.
– एस. एन. कुंभार, पिंपरी
पिंपरीतील उड्डाणपुलाची दुरुस्ती करा
पिंपरी – शगुन चौक, भाटनगर, मोरवाडी चौक आणि पिंपरी चौक यांना जोडणारा उड्डाणपूल 1984 मध्ये तयार केला आहे. सध्या या पुलाची अवस्था दयनीय झाली आहे. वेळीच दुरुस्ती केली नाही तर भविष्यात दुर्घटना घडण्याचीही शक्यता आहे. यामुळे महापालिकेने या पुलाची दुरुस्ती करावी
– तनिष्क देशमुख