कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांना कौतुकाची थाप
पुणे – करिअरच्या सुरुवातीची वर्षे म्हणून दहावी-बारावीकडे आजही पहिले जाते. या महत्त्वाच्या टप्प्यावर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देणे आणि त्यांना भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन आवश्यक असते. केवळ याच हेतूने दै. “प्रभात’च्या कार्यालयात अशा एका कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दै. ‘प्रभात’च्या कर्मचाऱ्यांच्या दहावी-बारावी परीक्षेतील गुणवंत पाल्यांचा कौतुक सोहळा शनिवारी उत्साहात करण्यात आला.
यावेळी ‘प्रभात’चे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, कार्यकारी संपादक अविनाश भट, मुख्य उपसंपादक अविनाश गोडबोले, लेखाधिकारी रवीकुमार इंडी व्यासपीठावर उपस्थित होते. वर्ष 2018 आणि 2019 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा एकत्रित गौरव शनिवारी करण्यात आला. इयत्ता बारावी उत्तीर्णांमध्ये अभिनव प्रवीण थूल, अनुष्का अशोक जोशी, वेद संजय खेडकर, प्रणव संतोष गोगावले, अथर्व प्रशांत कुलकर्णी, स्वरुप सुरेश शिंदे यांचा समावेश होता. तर दहावी उत्तीर्ण गुणवंतांमध्ये श्रुतिक दीपक पवार, रिया मुनेश गुरम, सोहम अमित खटावकर, वैशाली लक्ष्मण तायडे, सिद्धांत राजेश सावरकर यांचा समावेश आहे. यावेळी गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन कौतुक करून, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
“कोणास कमी गुण मिळाले म्हणून नाउमेद होऊ नका,’ असे सांगत बी. एल. स्वामी म्हणाले, “परीक्षार्थी म्हणून यश मिळविल्यास ते चिरंतन राहत नाही. मात्र ज्ञानार्थी विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवू शकतो. पुस्तकी ज्ञान आवश्यक आहे. त्याचबरोबर व्यवहार ज्ञान तितकेच महत्त्वाचे आहे. त्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. आपण शिक्षण घेत असताना वर्तमान काळात आनंदी जीवन उपभोगता आले पाहिजे. दुसऱ्यांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करा,’ हाच मूलमंत्र स्वामी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. “पुढील शिक्षण घेत असताना कठोर परिश्रम, आत्मविश्वास, मोठे ध्येय, दुसऱ्यांना सहकार्याची वृत्ती ठेवा,’ असेही ते म्हणाले.
दरम्यान, “विद्यार्थी नेहमी शिकत असतो. त्यामुळे नेहमी शिकण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा,’ असा सल्ला अविनाश भट यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास वारुंजीकर यांनी केले. तर जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी यांनी आभार मानले.
कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी ‘प्रभात शिष्यवृत्ती’
दै. ‘प्रभात’च्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी यावर्षीपासून शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला. दहावी-बारावी परीक्षांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या पाल्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची स्कॉलरशिप देण्यात येणार आहे, अशी घोषणा सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांनी यावेळी केली.
विद्यार्थी म्हणतात…
बारावीला 92.4 टक्के गुण मिळाले असून, सीईटीला 96.4 गुण प्राप्त झाले आहेत. आई-वडील आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले आहे. “कॉम्प्युटर सायन्स’मध्ये पदवी घेऊन करिअर करणार आहे.
– अनुष्का जोशी
दहावीला 92 टक्के गुण मिळाले आहेत. अकरावीला फर्गसन महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला आहे. बारावीनंतर ऍनिमेशन डिझाईन क्षेत्र निवडले आहे.
– रिया गुरम