महाराष्ट्रात आज आगळीक झाली. एका केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याची वेळ राज्याच्या पोलिसांवर आली. राज्यात यापूर्वी कधीच अशी घटना घडली नव्हती. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाचा कडेलोट आज महाराष्ट्राने अनुभवला. राणे यांनी सैल सोडलेली जीभच या संघर्षाला कारणीभूत ठरली हा या दिवसभरातील साऱ्या घडामोडींचा एका ओळीतील निष्कर्ष आहे, असे म्हणावे लागेल.
गेले अनेक दिवस नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करताना अत्यंत शिवराळ भाषेचा वापर केला आहे. तरीही आर्श्चयकाररित्या शिवसेना आणि त्यांचे नेते-कार्यकर्ते शांतच राहिलेले पहायला मिळाले. त्यातून मनोधैर्य वाढलेल्या राणे यांनी महाड येथे बोलताना मुख्यमंत्र्यांना उद्देशून त्यांच्या कानाखाली लावली असती असा शब्दप्रयोग केला आहे. त्यांची ही आगळीक आश्चर्यकारक आहे. त्यानंतर मात्र शांत राहणे शिवसैनिकांना शक्य नव्हते. राज्य सरकारही मग आक्रमकपणे कामाला लागले आणि त्यांनी थेट राणे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी पोलिसांची पथके चिपळूणला पाठवली.
आज दिवसभर राज्याच्या विविध भागातून निदर्शने, तोडफोड आणि राडेबाजीच्याच बातम्या पहायला मिळाल्या आहेत. महाराष्ट्रातील वातावरण नाहक खराब करण्याचे पाप राणेंकडून झाले आहे. वास्तविक केंद्रीय मंत्री या नात्याने अत्यंत जबाबदार भाषा त्यांनी वापरणे अपेक्षित होते. पण त्यांना जर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य करण्याची जबाबदारी भाजपच्या नेतृत्वाकडून देण्यात आली असेल तर ते काम इमानेइतबारे करणे आणि आपले मंत्रिपद त्यासाठी कारणी लावणे ही राणे साहेबांवरील राजकीय जबाबदारी ठरते.
अर्थात हे काम करतानासुद्धा त्यांना संयमी भाषेचा वापर करून मुख्यमंत्र्यावर टीका करणे अशक्य नव्हते. पण त्यांची पातळी मात्र दिवसेंदिवस खालावतच जाताना दिसली आहे. हा शिवसेना आणि राणे यांच्यातील राजकीय संघर्षा पुरताच मर्यादित विषय राहत नाही. एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जी भाषा वापरतो तो मुख्य आक्षेपाचा विषय बनतो. गल्लीतल्या भुरट्या गुंडांकडून एरवी जी भाषा आपण ऐकतो तीच भाषा ज्येष्ठ नेत्यांकडून ऐकताना कोणाही सूज्ञ नागरिकांच्या मनाला यातना झाल्याशिवाय राहत नाहीत.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही मग आपले मूळ स्वरूप दाखवून भाजपला बॅकफूटवर जाणे भाग पाडले आहे. आता भाजपचे नेते मात्र राणे यांच्या वक्तव्यापासून फारकत घेताना दिसत आहेत. राणे यांची तळी उचलायला ते तयार नाहीत असे दिसून आले आहे. या सगळ्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया काय आहे याची प्रतिक्षा होती. त्यांनीही साळसूदपणे राणे यांच्या वक्तव्याविषयी स्वत:ला आणि पक्षाला दूर ठेवण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी अशी भाषा योग्य नाही असे देवेंद्र फडणवीस राणेंना उद्देशून म्हणाले आहेत. फडणवीस यांच्या या भूमिकेचे स्वागतच केले पाहिजे. आम्ही राणेंच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही पण त्यांच्यावरील कारवाईचेही आम्ही समर्थन करणार नाही, असे ते म्हणाले आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील बरेच दिवस शांत राहिलेले राजकीय वातावरण मात्र एकदमच ढवळून निघाले आहे. “कोंबडीचोर’, “घरकोंबडा’ असे शब्दप्रयोग वापरून मुंबईत फलकबाजीही झालेली पहायला मिळाली. इतके सारे होऊनही राणेंची भाषा मात्र पुन्हा आक्रमकपणाचीच राहिली.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन तर केलेच; पण आम्हीही उद्या त्यांच्या घरापर्यंत जाऊ, असा इशारा त्यांनी दिलेला ऐकायला मिळाला. माझ्यावर अटकेची कारवाई करायला मी काय ऑर्डीनरी माणूस आहे काय, असा सवाल त्यांनी केला आहे. आज राज्यातील सरकार तुमच्या हातात असले तरी केंद्रातील सरकार आमच्या हातात आहे, असे उद्गार काढून त्यांनी हा संघर्ष दोन पातळीवरील सरकारपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे याचा अर्थ उर्वरित काळात ही दोन्ही सरकारे एकमेकांचे उणेदुणे काढून कुरघोड्या करण्यातच आपला वेळ घालवणार आहेत काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
वास्तविक आपल्या एखाद्या चुकीच्या वक्तव्याने नाहक वातावरण बिघडले असेल, तर आपले वक्तव्य सावरून घेऊन शांत राहणे राणे यांच्या सारख्या जबाबदार नेत्यांना शक्य नव्हते काय, हा यातला मुख्य प्रश्न आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यातील एकूणच राजकारणाच्या भाषा शैलीत कमालीची घसरण झालेली पहायला मिळाली आहे. उद्धव ठाकरे जसे मुख्यमंत्री झाले तशी भाजप नेत्यांची माथी भडकलेली पहायला मिळाली आहेत. त्यातून केवळ राणेच नव्हे तर भाजपच्या अन्य नेत्यांनीही उद्धव ठाकरेंवर सैल भाषेत टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांचीही एरवीच्या शिवसेनेच्या व्यासपीठावरील भाषणेही काही सौम्य स्वरूपातली नव्हती. त्यांच्याकडूनही काहीशी राणे शैलीचीच भाषा ऐकायला मिळाली आहे, पण उद्धव ठाकरे यांचे वैशिष्ट्य हे की मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी आपल्या तोंडावर कमालीचे नियंत्रण ठेवले आहे. अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
लोकप्रियतेच्या बाबतीतही त्यांनी देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे भाजप नेत्यांचा जळफळाट वाढीला लागणे अगदीच स्वाभाविक आहे. पण उद्धव ठाकरे हे आज केवळ एका पक्षाचे नेते नाहीत तर महाराष्ट्रासारख्या एका सुसंस्कृत राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या पदाची इभ्रत राखणे हे राज्यातील विरोधी पक्षांचे कर्तव्य ठरते.
या कर्तव्याचा विसर राणे यांच्या सारख्यांना पडला नसता तर बरे झाले असते. उद्धव ठाकरे यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यासाठीच भाजपश्रेष्ठींनी राणे यांना ताकद देण्याचे काम केले आहे हे सर्वश्रृत आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करणे म्हणजे त्यांना उद्देशून थेट कानाखाली मारण्याची भाषा करणे हे कोणत्याच अँगलने योग्य ठरत नाही.
हा सगळा विषय भाजपसाठी मात्र मनस्तापदायक ठरला आहे. या प्रकरणापासून धडा घेऊन भाजपनेही आपल्या पहिल्या व दुसऱ्या फळीतल्या अन्य नेत्यांनीही राज्य सरकारवर टीका करताना ती रचनात्मक असावी, थिल्लर स्वरूपातील नसावी याची दक्षता बाळगायला हवी.