स्वप्निल श्रोत्री
महापुराची समस्या ही कोण्या एका राष्ट्राची नसून ती जागतिक समस्या आहे आणि या समस्येकडे प्रत्येकाने जागतिक स्तरावर लक्ष देणे आवश्यक आहे.
गेल्या काही वर्षांत भारतातील ठरावीक भागात अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. साधारणपणे एक महिन्यात जितका पाऊस पडणे अपेक्षित असते तितका पाऊस हा 8 ते 10 तासांत पडतो. परिणामी, अचानक जोरदार आलेल्या पावसामुळे महापुराचा धोका वाढतो आणि उत्तर भारतासह दक्षिण भारतातील राज्ये व महाराष्ट्रातील काही जिल्हे हे पाण्याखाली जातात.
भारतीय पर्जन्यमानाचा अभ्यास केला तर दक्षिण भारतातील केरळ, तमिळनाडू, दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्य भारतातील राज्ये ही जास्त पावसाचा प्रदेश म्हणून ओळखली जातात तर पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्राचा उत्तर भाग हा परंपरागत कमी पावसाचा प्रदेश आहे. त्यामुळे केरळ, तमिळनाडू व ईशान्य भारतात जास्त पाऊस पडला तर त्याचे अप्रूप नाही. परंतु, एका मर्यादेच्या बाहेर जाऊन जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते निश्चितच चिंताजनक आहे.
वातावरणातील बदल जबाबदार
अचानक येणारे महापूर (फ्लॅश फ्लड) एक नवीन जागतिक आपत्ती म्हणून पुढे येत आहे. यावर्षी भारतासह युरोपातील जर्मनी, नॉर्वे, नेदरलॅंड, लक्झनबर्ग यांसारख्या देशात याशिवाय उत्तर अमेरिका, चीन, रशियाचा उत्तर भाग या ठिकाणी महापुराची समस्या दिसून आली. जगाच्या विविध भागात जेथे वेगवेगळी भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती आहे तेथे एकाच वेळी एकाच प्रकारची आपत्ती येणे हे येणाऱ्या जागतिक संकटाचे द्योतक आहे.
अचानक येणारा जोरदार पाऊस आणि त्यामुळे येणाऱ्या महापुरास स्थानिक कारणांसह अनेक कारणे जबाबदार असून वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साइड इतर ग्रीनहाउस गॅसेसचे वाढते प्रमाण जबाबदार आहे. पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते. याशिवाय ध्रुवावरील बर्फ तापमानवाढीमुळे वितळत असल्यामुळे ध्रुवाच्या जवळील नद्यांमध्ये पाणी पावसाआधीच जमा झाले असते. जास्त प्रमाणातील बाष्पीभवनामुळे जास्त पाऊस आणि नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अधिक पाणी साचल्यामुळे नदीच्या क्षमतेच्या बाहेर जमा झालेले पाणी रस्त्यांवर येते परिणामी महापुराची समस्या उद्भवते.
पावसाचे गणित
साधारणपणे एक चौरस किलोमीटर क्षेत्रफळात जर 1 एमएम पाऊस पडला आणि हे पाणी कोठेही वाहू न देता साठवले तर 10 लाख लिटर पाणी जमा होते.
बांबू आणि सुंद्रीची वने उपयोगी
महापुराच्या समस्येपासून एका दिवसात किंवा एका वर्षात सुटका होणे अशक्य आहे. परंतु, काही महत्त्वाच्या उपाययोजना केल्यास महापुराच्या समस्येवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येऊ शकते.
महापुरास जबाबदार असलेला कारणांमध्ये जागतिक तापमान वाढ हे प्रमुख कारण असून तापमान वाढीस कार्बन-डाय-ऑक्साइडचे वाढते प्रमाण जबाबदार आहे. बांबूची झाडे ही कार्बन-डाय-ऑक्साइड मोठ्या प्रमाणावर शोषून घेतात. एक व्यक्ती साधारणपणे एका वर्षात श्वासोच्छ्वासाद्वारे साधारणपणे 28 हजार किलो कार्बन-डाय-ऑक्साइडचे उत्सर्जन करते, तर एक बांबूचे झाड एका वर्षात साधारणपणे 36 हजार किलो कार्बन-डाय-ऑक्साइड शोषून घेते म्हणजे प्रति व्यक्ती 1 बांबूचे झाड लावल्यास वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण हे 30 ते 40 टक्क्यांनी कमी होईल.
याशिवाय बांबूच्या झाडाचे अनेक उपयोग असून काडेपेटीपासून अंतयात्रेपर्यंत सर्व ठिकाणी बांबूचे झाड उपयोगी येते. त्यामुळे बांबूची आर्थिक उलाढाल मोठी असून कमी वेळात जास्त लक्ष न देता बांबूची वने उभारणे शक्य आहे. घराच्या आजूबाजूला बांबूची झाडे असेल तर घर हे नैसर्गिकरित्या थंड राहण्यास मदत होते.
सुंद्रीच्या झाडाचे महत्त्वही बांबूप्रमाणेच अनन्यसाधारण आहे. त्सुनामीच्या लाटा थोपविण्याची ताकद ही सुंद्रीच्या झाडात असते. सुंद्रीच्या झाडाची मुळे ही जमीन घट्ट धरून ठेवतात त्यामुळे जमीन खचत नाही. ज्या ज्या ठिकाणी जमीन खचते अशा ठिकाणी सुंद्रीच्या झाडांची लागवड केली, तर पावसाळ्यात जमीन खचून गावेच्या गावे जमिनीखाली गाडले जाण्याचे प्रकार होणार नाहीत.
वाहत्या पाण्याला वाट मिळणे गरजेचे
महापुराचे मुख्य कारण म्हणजे पाणी एका ठिकाणी साठून राहणे हे आहे. अचानक येणाऱ्या पावसामुळे नदी-नाल्यांत जमा होणाऱ्या पाण्याला वाट मिळणे आवश्यक असते आणि जेव्हा नदी-नाल्यांत क्षमतेपेक्षा जास्त पाणी जमा होते तेव्हा ते रस्त्यांवर येते. नदीत होणारी बेकायदेशीर वाळू उपसा, नदीच्या पूरक्षेत्रामध्ये होणारे बांधकाम, सिमेंटचे रस्ते, नागरिकांकडून नदी-नाल्यांत आणि ड्रेनेजमध्ये टाकला जाणारा कचरा या कारणांमुळे पाणी रस्त्यांवर जमा होते.
महापुराची समस्या जागतिक समस्या बनली आहे. या समस्येकडे प्रत्येकाने जागतिक स्तरावर लक्ष देणे आवश्यक आहे. भारतात पर्यावरण हा विषय गांभीर्याने कधी घेतलाच गेला नाही. परिणामी, नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती आणि आपुलकीही दिसली नाही. फक्त आपले घरच नाही तर आपला परिसरही स्वच्छ ठेवणे ही सर्वांची जबाबदारी असून त्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.