काश्मीरी घटनांबाबत पाक प्रधानांशी वाटाघाटी करण्यांस नेहरू तयार नाहीत
दिल्ली, ता. 11 : काश्मीर परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करून दिल्लीत बैठक घेण्यासंबंधी पाक प्रधान मोहमदअली यांनी धाडलेल्या तारेस आज पंतप्रधान नेहरू यांनी उत्तर पाठविलें.
तांतडीने बैठक घेण्याची कल्पना पं. नेहरू यांना मान्य असली तरी लोकसभेच्या कामामुळें त्यांना एक दोन आठवड्यांत बैठक घेण्याइतकी उसंत मिळणे कठीण आहें असें समजतें. तसेच काश्मीरमधील ताज्या घटना या संपूर्ण राज्यांतर्गत असल्यानें त्यावर चर्चा करण्यांस पं. नेहरू तयार होतील असा रंग दिसत नाहीं. उभय प्रधानांच्या बैठकीची तारीख भारत सरकारने 2 व 3 सप्टेंबर अशी सुचविली होती. त्यांत अद्याप बदल झाला नाहीं, पण याप्रकरणी उभय पंतप्रधानांचे दरम्यान पत्रव्यवहार चालू आहे असें एका सरकारी प्रवक्त्यानें निवेदन केले.
मासिक 1000 रु. तनखा मंजूर केला…
श्रीनगर, काश्मीरचे पदभ्रष्ट वजीर शेख अब्दुल्ला यांच्या पत्नी बेगम अब्दुल्ला व पदभ्रष्ट महसूल मंत्री मिर्झा अफझल बेग यांच्या पत्नी बेगम अफझल बेग यांना काश्मीर सरकारने मासिक 1000 रु. भत्ता मंजूर केला आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्रांतून काश्मीरप्रकरणीं होणाऱ्या खोडसाळ प्रचाराची हजेरी
दिल्ली, ता. 11 : काश्मीरमधील ताज्या घडामोडीसंबंधी पाकिस्तान पत्रांतून- विशेषतः “डॉन’मधून जो प्रचार चालू आहें तो संपूर्ण खोडसाळपणाचा असून, खोटा व निराधार आहे असें भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने निवेदन केलें.
या पत्रांनी दिलेल्या वार्ता म्हणून वृत्तांत छापले असून श्रीनगरमध्ये हिंदी फौजांनी शस्त्रधाकाने मुसलमानांना गारद केले असें म्हटले आहें.
पाक हायकमिशनरकडे निषेध खलिता…
पंतप्रधान नेहरूंनी कालच लोकसभेंत श्रीनगरांतील किरकोळ निदर्शनांची हकिगत सांगून 3 ठार झाल्याचे निवेदन केले आहें. या खोट्या व भडक वार्तांसंबंधी भारत सरकारने पाक हायकमिशनरकडे खलिता धाडला असून यामुळें भारत-पाकसंबंध बिघडण्याचा धोका निदर्शनास आणला आहें.