सामाजिक बदल घडविणारे कायदा हे प्रभावी हत्यार
पुणे, ता. 21 – सामाजिक बदल घडवून आणणारे कायदा हे प्रभावी हत्यार आहे याचा आपण स्वीकार केला आहे. कायदा हा माणसासाठी आहे आणि माणूस गतीशील आहे. तेव्हा कायदा हा देखील स्थिर असून चालणार नाही. तोही गतीशील हवा, असे केंद्रीय अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आज येथे सांगितले. ते पुढे म्हणाले, कायदा शास्त्र शिकविताना प्राध्यापक विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवित असतो. शैक्षणिक संस्था नावारूपाला येतात त्या त्यांच्या इमारती व त्यातील पुस्तकांवरून नव्हे, तर त्या शैक्षणिक संस्थेतील शिक्षकांच्या कर्तृत्वामुळे.
पंतप्रधानांचे आवाहन
मद्रास – भारताच्या प्रगतीसाठी उडथळा होणाऱ्या अंध समजुती व निरुपयोगी चालीरिती लोकांनी सोडून द्याव्यात, असे आवाहन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी येथे बोलताना केले. आता भारत बलशाली व एकसंघ झाला असून सर्व जगाच्या आदराला पात्र झाला आहे.
भुट्टो यांची तिरकी चाल स्पष्ट होऊ लागली
नवी दिल्ली – भारताविरुद्ध झालेल्या युद्धात इराणने पाकिस्तानला महत्त्वाची शस्त्रास्त्रांची मदत केली व पाठिंबा व्यक्त केला, अशी माहिती अध्यक्ष झेड. ए. भुट्टो यांनी केट्टा येथील जाहीर सभेत बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, जम्मू व काश्मीरमधील जनतेला स्वयंनिर्णयाचा हक्क आहे या मागणीला इराणने पाठिंबा दर्शविला आहे.
कायदा शास्त्र शाखेतही संशोधन जरुरी
पुणे – विज्ञानाच्या आणि सामाजिक शास्त्रांच्या विविध शाखांमध्ये संशोधनात्मक कार्य करणारी प्रतिष्ठाने आहेत. परंतु कायदा शाखेत साधक बाधक विचार होऊन संशोधन होणे जरुर आहे. जपान आणि अन्य प्रगत देशात कालानुरूप कायद्यातील बदल होत आहेत, असे विचार केंद्रीय नियोजन खात्याचे राज्यमंत्री मोहन धारिया यांनी येथील लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे उद्घाटन करताना आज येथे मांडले.