नवी दिल्ली – मध्यपूर्वेतील युद्ध थांबावे यासाठी काही तोड काढावी या हेतूने भारत व अमेरिका यांचे दरम्यान उच्च पातळीवर संपर्क साधण्यात आला आहे. भारत युद्धात मध्यस्थी करील किंवा नाही ते सांगता येणार नाही परंतु यूनोबरोबर युद्धाची चिंता वाहील व युद्ध थांबावे अशी इच्छा धरील. अर्थात अरबांचा सारा प्रदेश इस्रायलने मुक्त केला पाहिजे हे भारताचे मत जगजाहीर आहे. इंदिरा गांधींनी सर्व अरब राष्ट्र प्रमुखांना युद्ध परिस्थितीबाबत पत्रे धाडली आहेत.
सारस बागेजवळ मुठा कालव्याला खिंडार
पुणे – सारसबागेजवळ आज सकाळी 11 चे सुमारास मुठा कालव्याच्या भिंतीला सुमारे 50 फूट लांबीचे खिंडार पडले व कालव्यातील पाणी तेथील जवळच्या नाल्यात वाहून जाऊ लागले. त्यामुळे आज शहराचा पाणीपुरवठा बंद पडला आहे.
कच्छतिवू बेटाचा
निर्णय लवकर घ्या
मद्रास – तामीळनाडू जनतेच्या भावना लक्षात घेऊन कच्छतिवू बेटासंबंधीचा उपाय शोधावा, अशी मागणी तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी आज पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे केली. ते पुढे असेही म्हणाले की, कच्छतिवू हे बेट भारताचा एक भाग आहे. केवळ तामीळनाडूची बाब म्हणून याकडे पंतप्रधानांनी पाहू नये.
केंद्राला दुर्बल कराल तर पस्तावाल!
लेक चिलका – केंद्र शासन दुर्बल करण्याचा विरोधी पक्षांच्या कृतीचा धोका पंतप्रधान इंदिरा गांधींनी आज येथे स्पष्ट केला. नाविक दलाच्या एका इमारतीची कोनशिला बसविल्यावर केलेल्या भाषणात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, जर कदाचित कालांतराने सर्व विरोधी पक्ष केंद्राला दुर्बल करण्यात यशस्वी झाले तर तेव्हा त्यांना त्यांची चूक समजण्यास फार उशीर झालेला असेल!