नाशिक – आज नाशिक येथे नाशिक विभागातील पत्रकारांच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि. वा. शिरवाडकर होते.
पत्रकाराचे खरे कर्तव्य कोणते?
सामाजिक बदल करण्याचे व्रत पत्रकारांनी घ्यावे. अद्ययावत दृष्टीकोन सामान्य माणसापुढे ठेवणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे. याशिवाय जातीय वाद व विषमता नष्ट होणार नाही, असे मत सुप्रसिद्ध कवी व लेखक कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांनी व्यक्त केले. ते नाशिक येथे बोलत होते.
संघर्ष हा पत्रकाराचा आत्मा वि. वा. शिरवाडकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, संघर्ष हा पत्रकारांचा आत्मा आहे. संघर्ष संपला की पत्रकारित्व संपले असे समजले पाहिजे. वृत्तपत्र हा हौसेचा उद्योग नाही. मी पंधरा वर्षे पत्रकार म्हणून होतो.
माझ्या जीवनात तो मानसिक सुखाचा व समाधानाचा काळ होता. समाजासाठी मी काही करतोय ही भावना मनात सदैव जागृत होती. वृत्तपत्र हा एक धर्म आहे. त्या धर्माचे पालन प्रत्येक पत्रकाराने केले पाहिजे.
पत्रकारांना योग्य श्रेणी व दर्जा मिळावा. आपण मनाने सोळाव्या शतकात वावरत असतो तर शरीराने विसाव्या शतकात असतो. हा शतकांचा फरक घालवण्यासाठी अभिरुचीकरण झाले पाहिजे. आजच्या समस्या समजावून घेतल्या पाहिजेत.
सरळ व सुबोध मराठी पत्रकाराला लिहिता आले पाहिजे. प्रत्येक धंद्याचा काही धर्म असतो. वाचकांविषयी आत्यंतिक प्रेम मनात बाळगणे पत्रकाराचा धर्म आहे.
जुने किस्से
पुण्याच्या दैनिक “प्रभात’मध्ये सहसंपादक म्हणून काम केल्याची आठवण आजच्या भाषणात वि. वा. शिरवाडकर यांनी सांगितली व त्यावेळी घडलेले काही किस्सेही सांगितले.