मंचर – शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यांत सर्व महाराष्ट्र पिंजून काढला आहे. सर्व ठिकाणी सभांना युवक, शेतकरी, महिला भगिनींची गर्दी यावरून येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्ता बदल होऊन आघाडी सरकारच निवडून येणार.तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना गुरुवारी (दि. 3) व्यक्त केला.
मंचर (ता. आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या महाविजय निर्धार सभेत खासदार डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी उमेदवार दिलीप वळसे पाटील,आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे,ऍड.राम कांडगे,शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा,किरणताई वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील, प्रीती शहा, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पक्षनिरीक्षक भगवान साळुंखे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सदस्या अरुणा थोरात, स्वाती पाचुंदकर, सुनिता गावडे, सविता बगाटे, तुलसी भोर, रूपाली जगदाळे, मानसिंग पाचुंदकर, केशर पवार, सभापती उषा कानडे, विश्वास कोहकडे, प्रकाश पवार, महिला अध्यक्षा सुषमा शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार, यशवंत पाचंगे, प्रदीप वळसे पाटील, सचिन भोर, शिवाजी लोंढे, निलेश पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, पराभव आधी रणांगणात नाही, तर तो मनात होतो. येथील विरोधकांचा पराभव मनात झालेला आहे. त्यामुळे वळसे पाटील यांचा महाविजय निश्चित आहे. राज्यात आघाडीचे सरकार येणार असून वळसे पाटील यांना पुन्हा एकदा मानाचे पान मिळणार आहे. जनतेने मला भरभरून साथ दिली. त्याच विश्वासाच्या जोरावर मी पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत आहे; परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधक माझ्यावर टीका करीत आहे.
भाजप-शिवसेना सरकारचा कोठेही पारदर्शी कारभार दिसत नाही. धनंजय मुंडे यांनी सरकारमधील 16 मंत्र्यांची भ्रष्टाचाराची 22 प्रकरणे बाहेर काढली. यामध्ये 90 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झालेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित मंत्र्यांना सोईस्कर क्लीन चिट देण्याचे काम केले आहे. गेल्या पाच वर्षांत राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 1 लाख 42 हजार कंपन्या बंद पडल्या. यामुळे बेरोजगारी वाढली आहे.
सरकारच्या विरोधात जनतेत असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेनेचा पराभव निश्चित असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी नमूद केले.
गेल्या 30 वर्षांत मी आंबेगाव तालुक्यातील सामान्य जनतेसाठी काम केले. पुढील पाच वर्षे बांधिलकीतून उर्वरित कामे आपल्याला पूर्ण करायची आहेत. पुढील काळात रांजणगाव येथे 300 खाटांचे सुसज्ज रुग्णालय,स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार आहे. त्यासाठी आपणाकडे आशीर्वाद मागण्यासाठी मी उभा आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये शेतीला पाणी, आरोग्य, रस्ते, शैक्षणिक सुविधा आपण निर्माण केल्या आहेत. कळमोडी धरणाचे पाणी खेड, शिरूर तालुक्यातील गावांमध्ये पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. हे सर्व करताना जनतेची साथ महत्त्वाची असणार आहे. त्यासाठी आपण सज्ज राहा.
– दिलीप वळसे पाटील, उमेदवार तथा माजी विधानसभा अध्यक्ष