येरवडा, दि. 29 (प्रतिनिधी)-धानोरीतील भैरवनगर सर्व्हे क्रमांक 51 मध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने येथील नागरिक संतप्त झाले असून शुक्रवारी तब्बल 11 तास वीजपुरवठा खंडित झाला होता. एकाच ठिकाणी तीन-तीन वेळा दुरुस्ती करावी लागत असेल तर या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भैरवनगर भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार मागील अनेक महिन्यांपासून घडत आहेत. एकाच ठिकाणी केबल जळण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिक वैतागले आहेत. वीजपुरवठा किमान 10 तास खंडित होतो. वीज पुरवठा खंडित झाल्यावर तो खंडित का झाला, वीज केंव्हा येईल यासाठी नागरिक संबंधित महावितरण कार्यालयात फोन करतात. मात्र, तेथील अधिकारी आणि कर्मचारी फोन उचलत नाहीत किंवा उडवाउडवीचे उत्तरे मिळतात.
दरम्यान, केबलमध्ये पावसाचे पाणी गेल्याने शुक्रवारी पहाटेपासून वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र, एकाच ठिकाणी वारंवार अंडरग्राउंड केबलमध्ये पाणी जाऊन केबल जळत असेल व ती सातत्याने दुरुस्त करण्यात येत असेल तर महावितरणती संपुर्ण केबल नवीन का टाकत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकाच ठिकाणी दुरुस्तीचा खर्च करून ठेकेदारांचे खिसे भरले जात आहेत. तीन-तीन वेळा फॉल्ट होत असेल तर ठेकेदार चांगले काम करत नसल्याचे उघड आहे, त्यानंतरही पालिका अशा ठेकेदारांवर मेहरबान असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
येरवडा परिसरात वारंवार एकाच ठिकाणी होणाऱ्या फॉल्टची चौकशी करण्यात येईल तसेच याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्यात येईल. वीज खंडित झाल्यास ती तातडीने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असतो. काही तांत्रिक अडचणी मोठ्या असतात.
– अशोक जाधव, कार्यकारी अभियंता, नगर रोड