मुंबई – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंदर्भात आज दिवसभर सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु होती. सुनावणी दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्याबाबतची याचिका फेटाळून लावली असल्यामुळे शिवसेना चिन्हाबाबत निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निकाल अद्याप बाकी आहे.
उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्याबाबत सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी झाली असून सुप्रिम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोगाला शिवसेना चिन्हाबाबत निर्णय घेता येणार आहे. खरी शिवसेना कोणाची यासह धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गट की उद्धव ठाकरे गटाकडे राहील किंवा ते गोठवले जाईल याबाबतचा निर्णय आता निवडणूक आयोग घेणार आहे. सुप्रिम कोर्टाचा हा निकाल उद्धव ठाकरे गटाला धक्का मानला जात असून शिंदे गटाला पहिला मोठा दिलासा असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निकाल अद्याप बाकी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.