सातारा – आत्तापर्यंत आपण विद्युत खांब रस्त्याच्याकडेला पाहत आलो आहोत. मात्र, साताऱ्यात उलट चित्र अनेकांना पाहायला मिळत आहे. सार्वजनिक विद्युत खांब एका व्यक्तीच्या चक्क किचनमध्ये असून, हा खांब हटविण्यासाठी घरमालक आणि वीजवितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये नुसतीच पत्रव्यवहारातून खडाजंगी सुरू आहे. विशेष म्हणजे हजारो होल्टच्या विळख्यात संबंधित कुटुंबीय रोजच मरणयातना भोगत आहे.
जिल्हा कारागृहाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या राजसपुरा पेठेमध्ये रशिद शेख आपल्या कुटुंबासमवेत राहतात. गेल्या काही वर्षांपासून त्यांचा भावांभावांमध्ये वाटपाचा दावा न्यायालयात सुरू होता. तिन्ही भावांमध्ये जागा वाटप होण्यापूर्वी त्यांच्या घरासमोर मोकळी जागा होती. या जागेत पूर्वीपासून वीजवितरणचा खांब आहे. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर तिन्ही भावांना घराची जागा वाटण्यात येणार होती. परंतु वीज वितरणचा खांब त्यांना अडथळा ठरत होता. त्यामुळे शेख यांनी निकाल लागण्यापूर्वीच आमच्या जागेतून खांब हटविण्यात यावा, अशी मागणी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली.
मात्र, त्यांना अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. काही दिवसांतच शेख यांचा वाटपाच्या दाव्याचा निकाल लागला. त्यावेळी तिन्ही भावंडांनी घर बांधण्यासाठी आपापसात जागा वाटून घेतली. घराच्या मधोमध खांब असलेली जागा रशिद शेख यांच्या वाटणीवर आली. हा खांब हटविण्यासाठी शेख यांनी बऱ्याचवेळा वीजवितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले. मात्र, त्यांच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही.
भर पावसात राहायचे कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिल्यामुळे नाईलाजास्तव त्यांनी सार्वजनिक खांब चारीबाजूंनी पत्रा लावून चक्क किचनमध्ये घेतला. एक वर्षे झाले शेख कुटुंबीय हजारो होल्टच्या विळख्यात संसार हाकत आहेत. रात्री-अपरात्री शॉर्टसर्किट होऊन खांबामधून वीज घरात पसरली तर या विचारानेच शेख कुटुंबीय भयभीत होत आहे. महिनाभरात पावसाळा सुरू होणार असल्याने शेख कुटुंबीय आणखीनच चिंतेत पडले आहे.