पुणे – करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यामुळे तब्बल दीड वर्ष बंद असलेल्या शाळा आता सुरु झालेल्या आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या 792 शाळांनी वीजबिल न भरल्यामुळे त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे.
वीज बिल न भरल्यामुळे पुणे जिल्ह्यातील बहुसंख्य शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. या सर्वच्या सर्व शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. जिल्ह्यात एकूण 3 हजार 639 जिल्हा परिषद शाळा आहेत. त्यापैकी 2 हजार 847 शाळांमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. तर इतर शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
यातील 128 शाळांचे मीटरचं वीज वितरणने काढून टाकले आहेत. या घटनेमुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वर्गाला मनस्ताप सहन करावा लागतो आहे. या गैरसोयीमुळेच राज्यातील पालक खाजगी शाळांची वाट निवडतात.
प्रशासनाच्या चुकांमुळे पटसंख्या कमी असणाऱ्या शाळा बंद झाल्या पण या पटसंख्या कमी होण्याचे मूळ कारण या गैरसोयी आहेत याची जाणीव कधी होणार? आदर्श शाळा म्हणून ज्या शाळांची उत्तम उदाहरणे दिली गेली पाहिजेत त्याच शाळा अंधारात असतील तर शिक्षणाचा प्रकाश कधी आणि कसा पडणार ? याचा विचार जिल्हा परिषद प्रशासनाने करावा, अशी मागणी यादव यांनी केली आहे.