- ग्रामीण भागात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यात महावितरण कंपनी अयशस्वी
- औद्योगिक वसाहतीमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यात यशस्वी
खालापूर : सध्या दिवस-रात्र उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना खालापूरच्या ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. “बत्तीगुल’मुळे नागरिकांमध्ये महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील बहुतांशी ग्रामीण भागात रात्री-अपरात्री तसेच दिवसाही विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढतच जात आहे. या प्रकारामुळे गृहिणींसह, ग्रामस्थ, तरुण व छोट्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने हा ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यात विद्युत महावितरण कंपनी सपशेल अयशस्वी ठरली आहे. महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराबाबत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये नाराजी सूर उमटत आहे.
महावितरण औद्योगिक वसाहतीमध्ये विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्यात यशस्वी कशी काय ठरते असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे विद्युत महावितरण कंपनीने योग्य त्या उपाययोजना राबवून ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबवावा, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
खालापूर तालुक्यात महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी देखभाल दुरुस्ती कामाच्या नावाखाली दर मंगळवारी शहरासह ग्रामीण भागात सक्तीचे “लोडशेडिंग’ करीत असतात. परंतु कंपनीच्या गलथान कारभारामुळे भारनियमनासह अतिरिक्त भारनियमनामुळे सर्वच नागरिक त्रस्त झाले आहेत. मंगळवारच्या भारनियमनाव्यतिरिक्त विद्युत पुरवठा वारंवार मोठ्या प्रमाणात खंडित होत आहे. विजेच्या लंपडावामुळे सर्व जण वैतागले आहेत. तसेच रात्री-अपरात्री वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्व ठिकाणच्या भागातील परिस्थिती विद्युत पुरवठ्याविना अतिशय बिकट झाली.
तालुक्यातील अन्य ग्रामीण गावात होत असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गानी विद्युत पुरवठा वारंवार खंडित होऊ नये म्हणून आपल्या कामात तत्परता बाळगावी, अशी प्रतिक्रिया उमटत आहेत.
आता वेळेतील दिवस-रात्र उष्म्याच्या तडाख्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील काही ठिकाणी रात्री-अपरात्री तसेच दिवसाही विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार दिवसागणित वाढतच जात आहे. या प्रकारामुळे गृहिणींना, ग्रामस्थांना व व्यापारी, व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यावर विद्युत महावितरण कंपनीने योग्य त्या उपाययोजना राबवून विजेचा लपंडाव थांबवावा.
– उत्तम परबळकर
पंचायत समिती सदस्य, खालापूर