खेड शिवापूर -शिवगंगा खोऱ्यातील खेड-शिवापूर परीसरात गेल्या अनेक महिन्यांपासून विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योग व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी आणि परिसरातील नागरिकही त्रस्त झाले आहेत.
खेड शिवापूर परिसरात दिवसा वीज नसल्यामुळे शेतात उसाला व अन्य पिकांना पाणी देण्यासाठी रात्री जावे लागते. तर ऊन वाढत असल्याने शेतीला पाणी देण्याचे प्रमाण वाढत आहे. रात्रीच्या अंधारात शेतकऱ्यांना साप-विंचू आदी विषारी प्राण्यांचा सामना करावा लागत आहे. दिवसातून किमान तीन ते चार वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यातच सध्या उन्हाचा चटका वाढतोच आहे. वीज नसल्याने नागरिक उकाड्यामुळे हैराण होत आहेत.
या भागातील शिंदेवाडी, वेळू, ससेवाडी, कासुर्डी या गावांत औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत. खंडित वीज पुरवठ्यामुळे बॅंका, पतसंस्था आदींच्या कामकाजातही अडथळा येत आहे. एकूणच या भागात विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त
झाले आहेत.
सध्या कांद्याचे पीक काढण्याच्या प्रक्रियेला वेग आला असल्याने शेतकऱ्यांना इतर पिकांना पाणी देण्यास वेळ मिळत नाही. जेवढा वेळ मिळतो त्यावेळी वीज पुरवठा नसल्याने पिकांची नासाडी होत आहे.
दादा पवार, अध्यक्ष,
नवविकास युवक शेतकरी संघटना
या आधीच्या विजेबाबतच्या अडचणी दूर केल्या आहेत. अनेकवेळा वीज जात होती. त्याचे काम पूर्ण केले असून, सध्याच्या परिस्थितीत उन्हाळा असल्याने विजेची थोडी अडचण निर्माण होत आहे.
नवनाथ घाटुळे,
उपकार्यकारी अभियंता,
महावितरण, नसरापूर उपविभाग