शरद पवार यांची सरकारवर टीका
मुंबई : राज्यातील आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या नेत्यांची पक्षांतराची प्रक्रिया जोर धरत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता याच मुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारवर सत्तेच्या गैरवापराचा आरोप केला आहे. केंद्र सरकार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या सत्तेचा गैरवापर करत आहे तसेच राष्ट्रववादीच्या नेत्यांवर पक्षांतरासाठी दबाव आणत असल्याची टीकादेखील त्यांनी केली आहे.
Sharad Pawar,NCP Chief: Central Govt is misusing their power before elections(Maharashtra), pressuring those leaders who are not willing to join BJP. This is not limited to Maharashtra, it has happened everywhere. pic.twitter.com/sNLozpgrXL
— ANI (@ANI) July 28, 2019
लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सीबीआय, एसीबीसारख्या यंत्रणांचा वापर करत असल्याचाही गंभीर आरोप शरद पवार यांनी केला. चित्रा वाघ यांनी नुकताच राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यासाठीदेखील सरकारच जबाबदार असल्याचे सांगत वाघ यांच्या पतीची एसीबीची चौकशी लावल्यामुळे त्यांनी भितीपोटी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे पवार यांनी म्हटले. तसेच शिवेंद्रराजे, संग्राम जगताप, बबन शिंदे आणि राहुल जगतापसह दिलीप सोहल हे सर्व पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा होत्या पण हे सर्व जण राष्ट्रववादीला सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्टीकरण शरद पवार यांनी यावेळी दिले.