शिर्डी: सत्ता हे आमच्यासाठी सेवा करण्याचे साधन असून खेड्याकडे चला हा महात्मा गांधीजींचा संदेश प्रत्यक्षात उतरवण्याचे काम भाजप सरकार करीत आहे, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.शेती महामंडळाच्या मैदानावर ग्रामविकास विभाग आणि अखिल भारतीय सरपंच परिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सरपंच व उपसरपंच कार्यशाळा व परिषदेच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या,ग्रामविकासाच्या सर्व योजनांना प्रत्यक्षात उतरवण्यात सर्व श्रेय हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आहे. सत्ता हे आमच्यासाठी सेवा करण्याचे साधन असून खेड्याकडे चला हा महात्मा गांधीजींचा संदेश प्रत्यक्षात उतरवण्याचे काम हे सरकार करीत आहे. तरुण आणि उच्च शिक्षित सरपंचांची वाढती संख्या हे ग्रामविकास विभागाचे चित्र आहे. पं.दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्याचे प्रयत्न होत आहेत. सरपंच पदाला प्रतिष्ठा देण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गाव बदलण्याचं काम सरपंच आणि उपसरपंच करीत आहेत. त्यामुळे त्यांना बळ देण्यासाठी थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे युवा, शिक्षित आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागाचं प्रतिनिधीत्व करताना दिसत आहेत. त्यामुळेच ग्रामविकासासाठी महत्वाच्या घटकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर, ग्रामपंचायत सदस्यांनाही बैठक भत्ता देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. त्यामुळे ग्रामविकासाचा रथ वेगाने धावू लागेल, असे देखील पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.