पेठ (वार्ताहर) -सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरात समाधान कारक पाऊस झाल्याने येथील शेतकरी बटाटा लागवड करण्यासाठी बियाणे खरेदी करत आहे. परंतु बियाण्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यात करोनामुळे मजूर मिळणे अवघड झाले आहे. बटाटा लागवड शेती क्षेत्रात काही प्रमाणात यंदा घट होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
बटाटा बियाणे, खते खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या पैशाची जुळवाजुळव शेतकऱ्यांना करावी लागत आहे. लॉकडाऊनमुळे व्यापारी, हुंडेकरी, दलाल आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सातगाव पठार भाग पावसाळी बटाटा पिकाचे आगार समजले जाते. कुरवंडी ते पारगाव पेठ भागातील साडेसहा हजार एकर क्षेत्रात विविध जातीचे बटाटा पिकाची शेतकरी जून, जुलै महिन्यात लागवड करतात.
सध्या बियाणे शीतगृहातून बाहेर आणल्यामुळे अतीथंड अवस्थेत असतात. बियाणांना मोड येण्यासाठी व सुकविण्यासाठी सामान्य तापमानात दीर्घकाळ ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे बियाणे ठेवण्यासाठी कोंबड्यांच्या पोल्ट्रीचा आसरा घेतला जात आहे. पोल्ट्रीमध्ये फक्त बियाणे सुकविण्यासाठी काही दिवस ठेवत असतात. पुढील काळातही बटाट्याची विक्री होते की नाही. या संभ्रमात शेतकरी असुन जवळपास 50 टक्के लागवड कमी होण्याची शक्यता आहे.
विविध जातीचे बटाटा बियाणांचा खरेदी भाव प्रति किंवटल 4 हजार ते 4 हजार 200 रुपये असा असल्याने बहुतांश शेतकरी अन्य पिकांकडे वळला आहे. मुख्यतः भुईमूग, सोयाबीन, वाटाणा आदी पिकांचे उत्पादन घेण्याकडे कल वाढला आहे. बटाटा बियाणे खरेदी भाव प्रती क्विंटल 4 हजार ते 4 हजार 200 तर उत्पादित बटाटे प्रती 10 किलो 120 ते 150 दरम्यान आहेत. करोना व बियाण्यांचे वाढलेले भाव यामुळे येथील शेतकरी यंदा कमी प्रमाणात बटाटा लागवड करत आहेत.
-दिलीपराव पवळे. बटाटा उत्पादक.