जबाबदारी कोणाची? याबाबत साशंकता
पुणे – महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता अंतिम टप्प्यात आहे. पण, या महाविद्यालयासाठीची कर्मचारी भरती अडचणीत सापडली आहे. ही भरती महापालिकेने करायची, की राज्यशासनाकडून करायची? याबबत संभ्रम निर्माण झाला असल्याने ही भरती रखडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या महाविद्यालयासाठी सुमारे 600 पदे भरली जाणार आहेत. कोणत्याही पदभरतीसाठी पालिकेने राज्य शासनाकडून सेवा प्रवेश नियमावली, तसेच पदे मंजूर केली आहेत. यामध्ये या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश नाही. त्यामुळे ही पदे भरायची झाल्यास पालिकेस शासनाकडे मान्यता घ्यावी लागेल.
मात्र, त्यासाठी बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पदे थेट राज्य शासनानेच भरावीत, असा पर्याय समोर आला आहे. मात्र, पालिकेची स्वतंत्र सेवा प्रवेश नियमावली असताना शासन कशी भरती करणार? असा दुसरा तिढा आहे.
प्रशासनाकडे ट्रस्टचा पर्याय
हे महाविद्यालय ट्रस्टच्या माध्यमातून उभारले जाणार आहे. त्यामुळे संभ्रमावर तोडगा काढण्यासाठी ही भरती ट्रस्टद्वारे करण्याबाबत महापालिका प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे.
मात्र, ट्रस्टला महापालिकाच निधी देणार असून पुन्हा ट्रस्टवर पालिकेचे पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यामुळे पुन्हा अप्रत्यक्षरित्या ही भरती महापालिकाच करणार आहे. त्यामुळे पुन्हा राज्य शासनाच्या मान्यतेची अडचण येते. त्यामुळे प्रशासन यावर काय तोडगा काढणार, यावर ही या कर्मचारी भरतीचे भवितव्य ठरणार आहे.