मुंबई – राज्यात झालेल्या सत्तांतर नाट्यानंतर विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांची निवड झाली. आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पदावर शिवसेनेने दावा केलेला असतानाच कॉंग्रेसकडूनही दावा केला जात असल्याने आघाडीत सर्वाकाही आलबेल सुरू नसल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेनेतील शिंदे गटाने भाजपाच्या मदतीने नवे सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर विधानसभेत 164 मत मिळवून त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे तिघेही इच्छुक आहे. यात मुख्य स्पर्धा शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये सुरू आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे 12 आमदार असून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे प्रत्येकी 10 आमदार आहेत. महाविकास आघाडी कायम राहिल्यास अन्य तीन आमदारांसह 34 आमदारांचे पाठबळ आहे. तर भाजपाकडे एकूण 22 आमदार आहेत. राज्यपाल नामनियुक्त 12 जागांसह इतर 3 जागा रिक्त आहेत.
शिवसेनेने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद मिळावे यासाठी विधान परिषद उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांना पत्र दिले होते. पण आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज या पदासाठी कॉंग्रेस इच्छुक असल्याचे सांगितले. तसेच यासंदर्भात कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात अन्य पक्षांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॉंग्रेसच्या मागणीला राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यास आघाडीत कॉंग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो. या मुद्यावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडू शकते.