अभिजित कुलकर्णी
भारतात शहरीकरण विशेषतः महानागरीकरण झपाट्याने होत आहे. गावाखेड्यातून पुण्या-मुंबईसारख्या मेट्रोपोलिटीन सिटींमध्ये येणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. पण यामुळे या शहरांचा विकास होत नसून उलट ती बकाल होत आहेत. याउलट देशातील काही लहान शहरांनी झपाट्याने विकसित होणाऱ्या जगभरातील 10 शहरांच्या यादीत स्थान पटकावले आहे. मलप्पुरम, कोझिकोड आणि कोल्लम ही ती तीन शहरे आहेत. हा विकासाच्या प्रक्रियेच्या दृष्टीने मिळालेला सकारात्मक संकेत आहे.
राष्ट्राच्या प्रगतीत हातभार लावणारी तीन शहरे जागतिक पातळीवर सर्वाधिक वेगाने विकास करताहेत. या तीन शहरांचा समावेश सर्वोच्च 10 शहरांच्या यादीत झाला आहे. मुख्य म्हणजे वेगाने विकास करणाऱ्या या शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरू सारख्या महानगरांचा समावेश यात झालेला नाही. तर अगदी लहानशा शहरांचा यादीत क्रमांक लागला आहे.
ही शहरे आहेत केरळमधील. केरळातील तीन अत्यंत लहानशी शहरे जी फारशी चर्चेत येत नाहीत. पण ती जागतिक पातळीवर वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत समाविष्ट झालेली आहेत. मलप्पुरम, कोझिकोड आणि कोल्लम ही ती तीन शहरे आहेत.
ब्रिटिश मल्टिनॅशनल मीडिया कंपनी द इकोनॉमिस्ट ग्रुपशी निगडीत इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या सर्वेक्षणानुसार, वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये मलप्पुरम जगात पहिल्या क्रमांकावर आहे. 2015 पासून 2020 दरम्यान या शहरात 44.1 टक्के बदल झाला आहे. कोझिकोडमध्ये 34.5 टक्के बदल झाला आहे ते चौथ्या क्रमांकावर आहे तर कोल्लम या शहरात 31.1 टक्के बदल होऊन ते 10 व्या क्रमांकावर आहे.
केरळचे त्रिशूर शहर 13व्या क्रमांकावर आहे. गुजरातमधील सूरत 26व्या क्रमांकावर आणि तामिळनाडूतील तिरूपूर 30व्या क्रमांकावर आहे. सर्वोच्च 10 शहरांमध्ये स्थान मिळवणाऱ्या अन्य शहरांमध्ये चीनच्या तीन आणि नायजेरिया, ओमान, संयुक्त अरब अमिराती, व्हिएतनाम या राष्ट्रांतील एक एक शहर सामील आहे. या सर्वेक्षणातून अनेक उद्योगपती, व्यापारी संघटना आणि अर्थतज्ज्ञ यांनी आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या आहेत.
लहान शहरांचा विकास होणे हा विकासाच्या प्रक्रियेच्या दृष्टीने मिळालेला सकारात्मक संकेत आहे. लहान शहरांची भरभराट होणे ही विकास प्रक्रियेच्या दृष्टीने पोषक आहे. विकास प्रक्रियेचे विकेंद्रीकरण होण्याचे निदर्शक म्हणूनही या गोष्टीकडे आपण पाहू शकतो. लहान शहरांमध्येही पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण होत आहे, विस्तारते आहे. तसेच रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या नव्या संधी निर्माण होत आहेत. आज देशातील अनेक लहान लहान शहरांमध्ये आधुनिक जीवनशैलीची अनेक लक्षणे दिसून येतात. नव्या प्रकारचे रोजगार, व्यवसायाच्या संधी, उत्तम प्रशासन, कमी गर्दी, उत्तम जीवनशैली आणि महागाईही कमी असणे ही लक्षणे जनहिताची आहेत. 1991मध्ये जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाची क्रांती घडून आल्यानंतर लहान शहरांवर त्याचा खोलवर परिणाम झाला. बदलाच्या प्रक्रियेत सामील होण्याची गरज वाढू लागली होती. माहिती क्रांतीमुळे लहान शहरांतील समाजही संपूर्ण देश आणि जगाशी जोडला गेला. त्यामुळे दृष्टिकोनात फरक पडला. राहणीमान आणि उपभोगाच्या सवयींमध्ये बदल झाला. तिथल्या तरुणांनी शिक्षण आणि नोकरी, रोजगार यांच्याविषयीचा आपला पारंपरिक दृष्टिकोन बदलला. तरुणांनी व्यवसायाकडे मोर्चा वळवला आणि तिथे बस्तान बसवण्यास सुरुवात केली. पूर्वी व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक स्वरूपाचा होता. पण गेल्या काही वर्षांत या लहान शहरांतील तरुणांनी बाजाराच्या मागणीनुसार नवे व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य आत्मसात करण्यावर भर दिला. त्यामुळे लहान शहरांमध्ये नव्या बाजारपेठा आणि तंत्रज्ञान यांच्याप्रमाणे वातावरण निर्माण झाले. परिणामी, सर्वच मोठ्या कंपन्या आणि विशेषतः माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी आपले बस्तान अशा शहरांमध्ये वसवले.
याखेरीज शहर विकासाच्या सरकारी योजनांचाही या लहान शहरांना फायदा झाला. अनेक शहरांमधून नोकरी, स्थिरतेच्या शोधात महानगरांकडे जाणाऱ्या युवकांची पावले थांबली. अर्थात, अजूनही देशातील बहुतांश लहान शहरे ही अगदी मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली आहेत. तिथे पायाभूत सुविधांची कमतरता आहे, शिक्षण, आरोग्य यांच्या चांगल्या सुविधा नाहीत. या सर्वांची व्यवस्था करण्याव्यतिरिक्त या शहरांना इतर लहान-मोठ्या शहरांशी जोडण्याचे काम होणे गरजेचे आहे. कारण देशाचा समग्र विकास हा लहान शहरांच्या विकासाच्या माध्यमातूनच शक्य होणार आहे.