क्रेडाईने अलीकडेच इंडिया-2030 एक्स्पप्लोअरिंग द फ्यूचर नावाचा अहवाल सादर केला आहे. 2030 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेची क्षमता आणि रिअल इस्टेट सेक्टरच्या प्रगतीबाबत विवरण करण्यात आले आहे. अहवालानुसार 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही 9 ट्रिलियन डॉलर होण्याची आशा आहे. त्यावेळी तब्बल दीड अब्ज लोकसंख्येतील प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न 5625डॉलर होऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे.
देशाचा जीडीपी हा 7 ते 8 टक्के राहण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कंपनीच्या सर्वसाधारण सभेत भारताची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत दहा ट्रिलियन डॉलर होण्याचे भाकित वर्तविले आहे. त्यामुळे क्रेडाईच्या दाव्याला एकप्रकारे पुष्टी मिळाली आहे.
आजघडीला अमेरिका, चीननंतर भारत तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ होण्याची शक्यता आहे. भारताचे डिजिटायजेशन, ग्राहकांची वाढती संख्या, तंत्रज्ञानाचा वापर यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. क्रेडाईच्या मते, आतापर्यंत पिछाडीवर राहिलेले रिटेल, लॉजिस्टिक्स उद्योगांचे योगदान आगामी काळात वाढेल. नव्या सरकारसमवेत नव्या भारताचे चित्र पाहत आहोत. या काळात संधीची मुबलकता असेल आणि त्यात व्यवसाय, घर खरेदी आणि समाजाचा विकास होईल. हे स्वप्न साकारण्यासाठी रिअल्टी क्षेत्राला बदलण्यासाठी क्रेडाई कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे.