नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी येथे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यावेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. त्या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सूचक वक्तव्य ममतांनी केले.
सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनात मोदी सरकार आणि भाजपची कोंडी करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. अशात पुढील लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांमध्ये ऐक्य घडवून आणण्याचे मिशन हाती घेऊन ममता दिल्लीत दाखल झाल्या आहेत.
विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेण्याचा सपाटा लावणाऱ्या ममता सोनियांच्या निवासस्थानी दाखल झाल्या. त्यांच्यात सुमारे पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ममतांनी भेटीबाबत समाधान व्यक्त केले. सोनियांनी मला चहापानाचे निमंत्रण दिले होते.
देशातील राजकीय स्थिती आणि विरोधकांच्या ऐक्याच्या मुद्द्यावर आमच्यात चर्चा झाली. आमच्यातील भेटीचे सकारात्मक परिणाम भविष्यात दिसण्याची आशा वाटते. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. सध्या राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या पेगॅसस प्रकरणावरही सोनिया आणि ममतांमध्ये चर्चा झाली.