– दत्तात्रय गायकवाड
हवेली तालुक्याच्या पूर्व भागामधील लोकसंख्या वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून लोकांच्या दैनंदिन गरजांचे महत्त्व वाढत आहे. याचाच एक भाग म्हणून गोरगरीब नागरिकांसाठी उज्ज्वला गॅस योजना शासनाच्या वतीने राबविली होती. या योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे.
योजनेमध्ये नागरिकांना सामील करण्यासाठी जिल्हा पुरवठा शाखा, विविध कंपन्यांच्या वतीने जनजागृती केली होती. अनेक जणांनी याचा लाभ घेतला. मात्र, एकदा गॅस खरेदीनंतर परत गॅसची टाकी भरून घेण्यासाठी नागरिकांचा उत्साह दिसून आला नाही. त्यामुळे वारंवार गॅसची टाकी भरण्याकामी सवलत देण्याची मागणी होती. उज्ज्वला गॅसचे सुरुवातीचे लाभार्थी आणि नंतर ते योजनेमधील प्रतिसाद कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी अनेक ठिकाणी जनजागृती करूनही प्रतिसाद कमी मिळाला आहे.
गॅस कंपन्यांकडून गॅसची घरपोच सुविधा देताना नियमबाह्य पद्धतीने नागरिकांकडून होणारी अवाजवी लूट थांबवण्यासाठी नागरिकांनी अनेकवेळा जिल्हा पुरवठा शाखेकडे तक्रारी केल्या आहेत. गॅस वितरण करणाऱ्या संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आणि नागरिकांची अवाजवी लूट थांबविण्यासाठी सध्यातरी प्रभावी यंत्रणा कार्यरत नसल्याचे चित्र दिसून आले आहे.