सहा महिन्यांत मिरचीचे भाव दुप्पट वाढले
विक्रीत 60 टक्के वाढ : प्रतिकिलो सध्या 240 रुपये दर
पुणे – तीन महिन्यांपूर्वी परतीचा आणि अवकाळी पावसामुळे देशातील मिरचीचे उत्पादन घटल्यामुळे भावात दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे गोरगरिबांना चटणी-भाकर आळणी लागत आहे. गेल्या तीन महिन्यांत 60 टक्के मिरची पावडरमध्ये वाढ झाली आहे. पुढच्या महिन्यात मिरचीची नवीन आवक सुमारच राहणार आहे. त्यामुळे महागाईची झळ सर्वसामान्यांवर मुळावर उठली आहे.
सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या जेवणातील अविभाज्य घटक असलेल्या मिरची पावडरचा भाव वधारला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गृहिणींना महागाईचा ठसका बसला आहे. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या चाकरमान्यांना आमटी-भाकरीवरच गुजराण करावी लागत आहे. त्यातच अवकाळीचा फटका जसा शेतकऱ्यांना बसला आहे. त्याचप्रमाणे उत्पादनातही बसला आहे. त्याचा फटका थेट ग्राहकांच्या खिशावर पडत आहे.
गेल्या तीन महिन्यांत मिरची पावडरचा भाव 60 टक्क्यांने वाढला आहे. त्यामुळे 180 रुपये किलो भावाने मिळणारी मिरची आता 240 रुपये प्रतिकिलोवर गेली आहे. त्यामुळे महिन्याकाठी प्रतिग्राहक 100 ते 150 रुपयांची झळ सोसत आहे. तीन महिन्यांपूर्वी तेजा जातीच्या मिरचीचा भाव हा प्रतिकिलो 140 रुपये होता. आज हाच भाव 220 रुपये झाला आहे.
जागतिक बाजारपेठेत प्रसिद्ध असलेली गंटूर मिरची 100 ते 120 रुपये प्रतिकिलो या भावाने मिळत होती. मात्र, सध्या हा भाव 180 ते 204 रुपये प्रतिकिलो झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी ब्याडगी मिरचीचा भाव प्रतिकिलो 125 रुपये होता. सध्या हा भाव 204 रुपये झाला आहे. या तीन जातीच्या मिरचीची आवक फक्त आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यांतून होत आहे. नेमका याच राज्यांना अवकाळीचा तडाखा बसला आहे. मात्र, अवकाळीचा फटका नवीन आवकेवरही होणार आहे. त्यामुळे मिरची पावडरचा भाव आटोक्यात येण्याची चिन्हे धूसर दिसत आहेत. याचा फटका गोरगरिबांच्या चटणी-भाकरीवर झाला आहे.
अवकाळीचा दणका; महागाईचा आगडोंब
देशात परतीचा आणि अवकाळी पावसाचा फटका आजही शेतकरी सोसत आहे, त्यामुळे उत्पादन घटल्यामुळे उत्पादित मालाचे भाव वधारले आहेत. त्यामुळे ग्राहकांना याची झळ बसत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत मिरचीचे उत्पादन हे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात मोठ्या प्रमाणात होते. तेजा, गंटूर, ब्याडगी या जातीच्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. या दोन राज्यातून संपूर्ण देशात पुरवठा केला जातो. मात्र, परतीचा पाऊस सुरू झाल्यानंतर मिरची पिकांना फटका बसला. त्याचपाठोपाठ अवकाळीचा तडाखा बसला. त्यात मिरची उत्पादक शेतकरी पुरते भुईसपाट झाले आहेत. एकीकडे अवकाळीतून उभारी न घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. मात्र, त्याचबरोबर महागाईच्या वणव्यात ग्राहकांची आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
जिल्ह्यातील पूरक उद्योगांना महागाईची झळ
पुणे शहर आणि जिल्ह्यात मिरची पावडरचे उत्पादन घेणाऱ्या सुमारे 25 कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून मिरची पावडरची निर्मिती केली जात आहे. जिल्ह्यातील विकसित आणि प्रगतीच्या वाटेवर असलेल्या तालुक्यांत मसाल्याचे उत्पादन घेतले जात आहे. या कंपन्यांकडून जिल्ह्याला पुरवठा केला जात आहे. पुरंदर, आंबेगाव, दौंड, बारामती आदी तालुक्यांत मसाले उद्योग आहेत. त्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहे. अर्थकारणाचा कणा असलेल्या ग्रामीण भागात हे सर्व उद्योग आहेत. महागाईमुळे ग्राहकांची खरेदी क्रयशक्ती मंदावली आहे.
यंदा अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादनाला बसला आहे. त्याची झळ शेतकऱ्यांबरोबर ग्राहकांना बसत आहे. तीन महिन्यांत मिरचीचे भाव दुप्पट झाले आहेत, त्यामुळे मिरची पावडरच्या दरात 60 टक्के भाववाढ झाली आहे. अजून नवीन मिरची आवक जानेवारीनंतर होणार आहे. त्यामुळे अद्याप दरवाढ टिकून आहे.
– प्रमोद शेडगे, प्रमोद मसालेवाले, सासवड.