भगवा आणि हिरवा या रंगाचा राजकीय फायदा घेण्यासाठी भेदाभेद करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांना निसर्गाने चपराक दिली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात जरी वैचारीक कटुता असली तरी भगव्या डाळींबाने गोडी आनली आहे.
पाकिस्तानच्या नागरीकांना कोपरगावच्या भगव्या डाळींबाची गोडी लागली आहे. कोपरगाव तालुक्यात पिकवलेल्या भगव्या डाळींबाची विक्री थेट पाकीस्तानात होते. तिथे रंग न पहाता शरीराला आवश्यक व चवीला गोड असणारी ही भगवी डाळींब प्रिय वाटत आहे. विषेश म्हणजे या डाळींबाचे नावच भगवी आहे.
पाकिस्तानातील काहींना भगव्या रंगाचा कडवटपण वाटणाऱ्यांना कोपरगावच्या भगव्या डाळींबाने गोडी लागली आहे. गेल्या तिन वर्षांपासून पाकीस्तानात भगव्या डाळींबाला मागणी वाढत आहे.
दरवर्षी कोपरगाव बाजार समितीतून खरेदी केलेल्या शेंद्री भगव्या डाळींबांना देशाची राजधानी दिल्लीसह,आग्रा जयपूर, लखनौ,राजस्थान,गुजरात, मध्यप्रदेश,बिहार, उत्तरप्रदेश, पंजाबमध्ये सर्वाधिक मागणी आहे.
खाण्यासाठी चवदार व टिकावू असलेल्या भगव्या डाळींबाची शेती कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसह शेजारच्या तालुक्यातील शेतकरी आवडीने करीत आहेत. बाजारपेठेत आरक्ता, नंदीनी अशा डाळींबाचे वान अर्थात प्रकार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असुनही आज भगव्या डाळींबाची मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीचा विचार करुन तालुक्यातील बक्तरपूर, वडगाव, शहापूर कोळगाव, कोळपेवाडी सह अनेक गावातील शेतकरी फळबागाकडे वळत आहेत.
कोपरगाव बाजार समिती म्हणजे केवळ कांदा व भुसार मालाची खरेदी विक्री करणारी बाजार समिती अशी ओळख होती माञ आपली जूनी ओळख पुसुन काढीत डाळींबाची खरेदी विक्री सुरु करुन नवा विक्रम केला आहे. कोपरगावच्या भगव्या डाळींबांना देशासह विदेशात मागणी वाढली आहे. विषेशत: पाकिस्तानच्या नागरीकांना कोपरगावच्या भगव्या डाळींबांची गोडी लागल्याने कोपरगाव बाजार समितीतून दरवर्षी हजारो टन डाळिंब पाकिस्तानमध्ये पाठविले जाते.
कोपरगाव कृषि उत्पन्न बाजार समितीने अल्पावधीत डाळींबाची खरेदी विक्रीतून कोट्यावधी रुपयाची उलाढाल करून शेतकरी व व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. कोपरगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणनेल्या शेतमालाच्या विक्रीचे पैसे रोख मिळवून देण्याची विशेष व्यवस्था केल्याने शेजारच्या तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी आपला माल कोपरगाव बाजार समितीत विक्रीसाठी घेवून येत आहेत. म्हणुनच कांदा व भुसार माला बरोबर फळ विक्रीमध्ये डाळींबाची खरेदी विक्रीचा विक्रम होत आहे.
सन २०२०- २०२१ या आर्थीक वर्षात कोपरगाव बाजार समितीत डाळींबाची १८हजार ७०८ क्विंटलची आवक झाली तर सर्वाधिक भाव २७ हजार ७७५ रूपये प्रति क्विंटल देण्यात आला होता. तब्बल २० कोटी १२ लाख ४ हजार ५४० रुपयाची सरासरी आर्थीक उलाढाल झाली. सध्या बाजार समितीत आडतदार – निकेत काळे व , रिजवान खान हे दोन प्रमुख खरेदीदार शेतकऱ्यांकडुन खरेदी करतात. ७ व्यापारी परवानाधारक खरेदीचे दुकानदार आहेत तर १० व्यापारी त्यांच्याकडून खरेदी करणारे आहेत.
कोपरगाव बाजार समितीतून दररोज सरासरी १० टनापेक्षा अधिक डाळिंब परराज्यात व विदेशात विक्रीसाठी पाठविले जातात. जालणा, औरंगाबाद, गंगापूर, चाळीसगाव, पाथर्डी, संगमनेर, राहता, नेवासा, वैजापूर, नाशिक जिल्ह्यातील येवला, लासलगाव,सटाणा, सोमठाणा, सिन्नर येथील शेतकऱ्यांच्या डाळींबाची कोपरगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी आवक होते.
येथील डाळींब खरेदी करण्यासाठी कोपरगाव, येवला, मालेगाव, धुळे, मनमाडचे मोठे फळव्यापारी येतात.मेहमुदभाई बागवान, मेहराज बागवान, फारुख बागवान सिराज शहा, तैफिक बागवान, हुजैफ बागवान हे फळव्यापारी सर्वञ डाळींबाची विक्री करतात जुलै,ते डिसेंबर या दरम्यान सर्वाधिक डाळींबाची आवक असते. कोपरगाव बाजारसमितीतील डाळींबाचे वाढती खरेदी विक्रीमुळे आर्थीक उलाढालींना चालना मिळाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील निकेत काळे हे संगणकीय अभियंता असताना फळविक्रीचा व्यवसाय सुरू करुन आज कोपरगाव बाजार समितीत सर्वाधिक डाळींब खरेदी करणारे तरुण व्यापारी म्हणून नावलौकीक मिळवला आहे.
‘राधाकृष्ण फ्रुटस’ या नावाने बाजार समितीत रितसर परवाना घेवून त्यांनी एकट्याने गेली दोन वर्षापासुन कोपरगाव बाजार समितीत हजारो टन डाळींबाची खरेदी करुन कोट्यावधी रुपयांची उलाढाल केली आणि शेतकऱ्यामध्ये विश्वास संपादन केला आहे.
कोपरगाव बाजार समितीत सुरुवातीला डाळींबाच्या केवळ ४० कॅरेटची आवक होती ती आता ५ हजार कॅरेटच्या पुढे वाढवली आहे. बाजार समितीत आता डाळींब खरेदी विक्रीसाठी जागा अपुरी पडत आहे तेव्हा अधिक जागा उपलब्ध करून देण्याची मागणी काळे यांनी केली आहे…
दरम्यान कोपरगाव बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर म्हणाले,शेतकऱ्यांच्या विकलेल्या शेतमालाचे पैसे सध्या दररोज रोख देत असल्याने तालुक्यासह इतर तालुक्यातील शेतकरी कोपरगाव बाजार समितीत माल विक्रीसाठी घेवून येत आहेत. इतर ठिकाणी किंवा पुर्वी शेतकऱ्यांना उशिरा पैसे दिले जात होते.
खरेदी विक्रीतुन येथे दररोज सरासरी दिडकोटी रुपये शेतकऱ्यांना रोख दिले जातात. रोख पैसे दिल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांसह शेतीशी निगडित इतर व्यवसायीकांना होत आहे. रोख चलन फिरत असल्याने सर्वांना लाभ होतोय.
कोपरगाव बाजार समितीत डाळींबासह इतर सर्वच शेतीमालाला बाजारभाव चांगला मिळत असल्याने येथे आवक वाढत आहे. शेतकरी व व्यापारी यांच्यासाठी लागणाऱ्या सुविधा पुरवण्यासाठी योग्य नियोजन बाजार समिती करीत आहोत. भविष्यात यापेक्षा अधिक उलाढाल करण्यासाठी बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले व संपूर्ण संचालक मंडळ प्रयत्न करीत आहे.
अनेक शेतकरी थेट शेतातून शेतमालाची विक्री परस्पर विना परवाना व्यापाऱ्यांना केल्याने शेतकऱ्यांची आर्थीक फसवणुक होते. व्यापारी वेळेत पैसे देत नाहीत तेव्हा शेतकऱ्यांनी परस्पर विक्री न करता बाजार समितीतून विक्री करावी असे आवाहन सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले व सचिव नानासाहेब रणशुर यांनी केले आहे .
बदलत्या काळानुसार कोपरगाव बाजार समितीने संगणकीय कामकाज सुरु केल्याने अनेक व्यवहारात गतीमानता येवून पारदर्शक होत आहे. याचा लाभ सर्वांना होत आहे.