नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज सात राज्यांतील 59 मतदारसंघात मतदान झाले. हे मतदान बहुतांशी सुरळीत पार पडले असून प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 60 टक्के इतके मतदान तिथे नोंदवले गेले आहे. या टप्यात दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान घेण्यात आले.
राजधानी दिल्लीत मतदारांचा लक्षणीय उत्साह दिसून आला. आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम बंगाल मधील ज्या मतदार संघांमध्ये आज मतदान घेण्यात आले तेथील मतदानाचे प्रमाण सुमारे 80 टक्के इतके नोंदवले गेले आहे. बिहार – 55.04, हरियाणा – 62.14, मध्य प्रदेश – 60.12, उत्तर प्रदेश – 50.82, पश्चिम बंगाल – 80.13, झारखंड – 64.46, दिल्ली – 55.44 या टप्प्यात दिल्लीतल्या सर्व सात जागांवर मतदान पार पाडले.
आजच्या टप्प्यात हरियाना राज्यातील सर्व दहा मतदार संघांमध्ये मतदान झाले तेथे सुमारे 62 टक्के मतदारांनी आपला मतदानाच हक्क बजावला. आजच्या मतदानाने केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, राधामोहनसिंग, दिग्विजयसिंह, साध्वी प्रज्ञा, दिल्ली प्रदेश भाजपचे प्रमुख मनोज तिवारी, मनेका गांधी, नरेंद्रसिंह तोमर, शीला दीक्षित, ज्योतिरादित्य शिंदे, अखिलेश यादव इत्यादी प्रमुख उमेदवारांचे भवितव्य मतदार यंत्रात बंद झाले आहे. आजच्या मतदानाच्यावेळी किरकोळ हिंसक प्रकार वगळता अन्य मोठे अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. पश्चिम बंगाल मध्ये काही किरकोळ हिंसक प्रकार घडले आहेत.
आता लोकसभा निवडणुकीचा शेवटचा सातवा टप्पा केवळ बाकी राहिला आहे. तो झाल्यानंतर देशातील मतदानाची प्रक्रिया पुर्ण होणार आहे. सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी येत्या रविवारी 19 तारखेला मतदान होणार आहे. त्यात पंतप्रधानांच्या वाराणसी मतदार संघांचाहीं समावेश आहे.