नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यानंतर युरोपियन युनियनच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेत पाकिस्तान अपप्रचाराची पोलखोल केली आहे. दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत आम्ही भारताच्या सोबत आहोत. आमच्या दौऱ्याला राजकारणाचा रंग देणे चुकीचे असून कलम ३७० भारताचा अंतर्गत प्रकरण आहे, असेही स्पष्टीकरण युरोपियन शिष्टमंडळाने दिले. दरम्यान, युरोपियन शिष्टमंडळ काश्मीरच्या दौऱ्यावर असताना विरोधी पक्षांकडून मोदी सरकारला सातत्याने लक्ष केले जात होते.
युरोपियन शिष्टमंडळाने म्हंटले कि, आमच्या दौऱ्यावर वाद घालणे चुकीचे आहे. आम्ही ४० वर्षातून २० वेळा भारत दौऱ्यावर येतो. पाकिस्तानचाही दौरा आम्ही केला आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या ‘नाझी लव्हर्स’ टीकेलाही प्रत्त्युत्तर देताना ते म्हणाले, आम्ही नाझीवादी असतो तर आम्हाला जनतेने निवडून दिले नसते.
ते पुढे म्हणाले, दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे. दहशतवाद कोणत्याही देशाला नष्ट करू शकतो. यावर वेळीच उपाययोजना करायला हव्या. आम्हाला काश्मीरला दुसरा अफगाणिस्तान बनताना पाहायचे नाही.
काश्मीर दौऱ्यात आम्हाला तेथील स्थानिक मुद्दे समजण्यास मदत झाली. काश्मीर नागरिकांना शांतात आणि विकास पाहिजे आहे. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. दिल्लीतून येणारा निधी जनतेपर्यंत पोहचत नसल्याचे तेथील एका काश्मिरी रहिवाश्याने सांगितले असल्याचेही युरोपियन सदस्याने म्हटंले आहे.