राष्ट्रवादीचे संदीप पवार यांचा आरोप
पिंपरी – करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार उपाययोजना करत आहे. मात्र, भाजपाचे प्रदेश नेत्यांनी “कोविड’चे राजकारण करण्याची भूमिका घेतली. प्रदेश नेत्यांच्या सुरात सूर मिसळत भाजपाच्या स्थानिक आमदारांनी टीका-टिपण्णीचे राजकारण सुरू केले आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी असलेल्या आमदारांनी शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संदीप पवार यांनी केले आहे.
संदीप पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शहरातील भाजपाच्या विद्यमान दोन्ही आमदारांनी पूर्वाश्रमी राष्ट्रवादीत असताना महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत काम केले आहे. पवार यांच्या कामाची पद्धत तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे करोनाच्या परिस्थितीत लोकांना मदत करण्यासाठी जिथे सरकार कमी पडत असेल, तिथे विरोधी पक्षातील लोकांनी मदतीसाठी पुढे आले पाहिजे. मात्र, तसे न करता केवळ टीका-टिपण्णी केली जात आहे.
पालकमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. लोकप्रतिनिधींच्या बैठकीला भाजपाचे दोन्ही आमदार उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही आमदारांनी पिंपरी-चिंचवडसाठी कोण-कोणत्या सूचना केल्या. याबाबत सविस्तर बोलले पाहिजे. त्या सूचनांना प्रतिसाद मिळाला नसेल, तर आरोप आणि आक्षेप घेणे योग्य होईल. अन्यथा निराधार आरोप करून आमदार काय साध्य करणार आहेत? असा प्रश्नही पवार यांनी उपिस्थत केला आहे.