लातूर जिल्ह्यातील अहमदपूर-चाकूर हा मतदारसंघ सर्वच पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता येथून आतापर्यंत कॉंग्रेसच्या उमेदवारांना फक्त चार वेळा कौल दिला आहे. तर, उर्वरित निवडणुकांत भाजप आणि अपक्षांनी विजय मिळवला आहे. कदाचित त्यामुळेच दिल्लली ते गल्लली सत्ता असताना कॉंग्रेसने या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम आज नागरिकांना भोगावे लागत आहेत.
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासाठी होमपिच असलेल्या या मतदारसंघाला कायमच सापत्न वागणूक मिळत आली आहे. शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे, व्यापार आणि बाजारपेठेच्या दृष्टीने अहमदपूर मराठवाड्यात ओळखले जाते. पण, पिण्याच्या पाण्याची टंचाई येथे देखील नागरिकांच्या पाचवीला पूजली गेली आहे. कोणीही आमदार, खासदार असले, तरी मतदारसंघासाठी मोठा सिंचन प्रकल्प येथे उभारण्यात आलेला नाही. शिवाय कोणतेही मोठे उद्योग येथे या मतदारसंघात नाहीत. त्यामुळे इयत्ता बारावीपर्यंत शैक्षणिक गुणवत्ता असूनही येथील तरुणांना उच्च शिक्षणासाठी नांदेड, लातूर किंवा पुणे-औरंगाबादकडे जावे लागते. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाणही मोठे आहे. या भागातील अनेक गावांत ऊसतोडणी कामगार आहेत. राज्यभरात ते कामानिमित्त जातात.
अहमदपूर मतदारसंघात मराठा, लिंगायत, वंजारी आणि मुस्लीम मतदारांची संख्या मोठी आहे. पण,पक्षाकडे पाहून मतदान करण्याचा पायंडा येथील मतदारांनी कधीच मोडीत काढला आहे. धनगर आणि वंजारी समाजाची मते निर्णायक ठरणारी आहेत. कोणताही समाज एकगठ्ठा मतदान करत नाही. येथे उमेदवार पाहून निर्णय घेतला जातो. त्यामुळे यंदा वंचित बहुजन आघाडीचा योग्य उमेदवार दिल्यास सर्वच पक्षांना फटका बसू शकतो.
2009मध्ये “रिडालोस’ अर्थात रिपब्लिकन डावी लोकयाही समितीकडून निवडून आलेले बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना 2014 मध्ये अपक्ष उमेदवार विनायकराव पाटील धूळ चारली. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्या युद्धात अवघ्या चार हजार मतांनी विनायकराव यांनी विजय मिळवला होता. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी मागील काही महिन्यांत या मतदारसंघाकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे विनायकरावांचे वजन वाढले असले, तरी भाजपचा एक गट त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे तिकीट कोणाला मिळते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
नांदेड, लातूर, बिदर, परळी, परभणी या प्रमुख शहरांना जोडणारा मार्ग अहमदपूरमधून जातो. पण, रस्ते विकासाकडे कायमच दुर्लक्ष होत आले आहे. अहमदपूर शहरात वाहतूक कोंडीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे बाह्यवळण मार्गाची जुनी मागणी आहे. त्यासाठी मागील 4-5 वर्षांत चर्चा सुरू असली, तरी भूसंपादनासाठी घोडे अडले आहे. त्यामुळे हा मार्ग कधी होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.