तिसऱ्याही वर्षी जत्रा सांगवीतच का?
पिंपरी – दरवर्षी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येते आणि दरवर्षी या जत्रेवरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरु होते. त्याप्रमाणे यावर्षीही महापालिकेने पवनाथडी जत्रेचे आयोजन केले आहे आणि आयोजनावर आरोपांची सुरुवात झाली आहे. शहरातील महिला बचत गटांना व्यासपीठ मिळावे. तसेच, त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, याकरिता महापालिकेकडून दरवर्षी पवनाथडी जत्रा भरविण्यात येते.
करदात्या नागरिकांच्या पैशातून भरविण्यात येणारी पवनाथडी जत्रा व राजकीय मंडळींचे वाद हे समीकरणच झाले आहे. यंदा सलग तिसऱ्या वर्षी सांगवीत ही जत्रा भरविली जाणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यभागी ही जत्रा भरविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना यांनी केली आहे. याबाबत महापौर माई ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीकडून महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. महिला उद्योजक तयार व्हावेत तसेच, त्या आर्थिक सक्षम व्हाव्यात म्हणून पवनाथडी जत्रेचे आयोजन दरवर्षी केले जाते. ही जत्रा महापालिकेच्या खर्चातून केली जाते.
दरम्यान, यंदा सलग तिसऱ्या वर्षीही पवनाथडी जत्रा सांगवी येथे भरविली जात आहे. त्यामुळे शहरातील सर्वच महिला बचत गटांना ते ठिकाण सोयीस्कर होणार नाही. अनेक महिला बचत गट यामुळे नाराज आहेत. शहरातील सर्व महिला बचत गटाच्या सोयीनुसार आपण पवनाथडीचे ठिकाण निश्चित करणे अपेक्षित आहे. परंतु, पवनाथडी जत्रेत राजकारण चालू आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व महिला बचत गटांना सोयीचे व योग्य, शहराच्या मध्यभागी असणारे ठिकाण असायला हवे, अशी मागणी मनसेच्या सीमा बेलापूरकर, अश्विनी बांगर, संगिता देशमुख, अनिता पाचांळ, सुचिता वाघमारे, श्रध्दा देशमुख, दक्षता क्षीरसागर, दुर्गा पवार आदी महिला पदाधिकाऱ्यांनी महापौर ढोरे यांना निवेदन दिले आहे.