चंडीगढ – पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी नवा राजकीय पक्ष स्थापण्याचे सूतोवाच केल्यानंतर त्या राज्यातील राजकारण तापू लागले आहे. भाजपने अमरिंदर यांची प्रशंसा करतानाच त्यांच्याशी समझोता करण्यास राजी असल्याचे संकेत दिले आहेत. तर, कॉंग्रेसने त्यांच्यावर टीकेचा प्रहार केला आहे.
मुख्यमंत्रिपद गमवावे लागल्याने नाराज झालेल्या अमरिंदर यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा इरादा आधीच बोलून दाखवला होता. त्यानंतर मंगळवारी त्यांनी नवा पक्ष स्थापण्याचा मानस उघड केला. एवढेच नव्हे तर, शेतकरी आंदोलनावर शेतकऱ्यांच्या हिताचा तोडगा निघाल्यास भाजपशी जुळवून घेण्याचीही तयारी दर्शवली.
त्या भूमिकेला भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. भाजपचे पंजाब प्रभारी दुष्यंत गौतम यांनी अमरिंदर यांचा उल्लेख देशभक्त म्हणून केला. राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्यांशी हातमिळवणी करण्याचा पर्याय भाजपने खुला ठेवला आहे, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, कॉंग्रेसच्या गोटातून अमरिंदर यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. त्यासाठी पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा पुढे सरसावले. अमरिंदर हे संधिसाधू नेते आहेत. ते केवळ स्वत:चा आणि कुटूंबाचा विचार करतात. ते पंजाबच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करताना दिसतात. पण, पंजाबला पाकिस्तान किंवा चीनचे भय नाही. पंजाबला कुठला धोका असेल तर तो अमरिंदर यांच्यापासून आहे, असे ते म्हणाले.