सोलापूर – उजनी धरणातील पाणी इंदापूरला पळविल्याचा आरोप सिद्ध झाल्यास राज्यमंत्री, आमदारकीचा नव्हे तर राजकीय संन्यास घेईन, असा इशारा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिलो. विरोधकांनी चुकीची माहिती लोकांमध्ये पसरवून बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्याचेही त्यांनी सांगितले.
उजनी धरणातील पाणी वाटप यापूर्वीच निश्चित झालेले आहे. त्यामुळे त्यात आता कोणताही बदल करता येत नाही. परंतु, आपली भूक भागविण्यासाठी दुसऱ्याच्या ताटातील भाकर हिसकावण्याचे संस्कार माझ्यावर झालेले नाहीत, असेही भरणे यांनी उत्तर दिले. रविवारी पालकमंत्र्यांनी नियोजन भवनात कोरोनाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
जिल्ह्यातील करोनाचे संकट दूर करण्यासाठी सर्व घटकांची मदत गरजेची आहे. जिल्ह्यासाठी इंजेक्शन, लस, रेमडेसिव्हिर इंजेक्शन पुरेशा प्रमाणात मिळावेत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर विना कोणता रूग्ण दगावणार नाही, याची खबरदारी प्रशासनातर्फे घेतली आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, खासगी रूग्णालयांनी उपचारांचे दर फलक बाहेर लावावेत आणि त्यापेक्षा अधिक दर घेतल्यास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी दिला.