नगर – नगर शहरातील बहुचर्चित उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाच्या श्रेयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार डॉ. सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी उड्डाणपूलाची पाहणी करून पूल उभारणीच्या श्रेयाबाबत उल्लेख करतांना माजी आमदार कै. अनिल राठोड याच्या नाव न घेतल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी थेट खा. डॉ. विखे यांच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून टीका केली.एवढ्यावर शिवसैनिक थांबले नाही तर त्यांनी आज सकाळी उड्डाणपूलाचे औपचारिकरित्या उद्घाटन देखील केले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना राज्यसहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव,माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अशोक बडे, दत्ता कावरे, विजय पठारे, संतोष गेनप्पा, अमोल येवले, संग्राम कोतकर, अशोक दहिफळे, बबलू शिंदे, परेश लोखंडे, पारुनाथ ढोकळे, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, श्रीकांत चेमटे, शरद कोके, संदिप दातरंगे, अरुणा गोयल आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संभाजी कदम म्हणाले, नगरमध्ये उड्डाणपुल व्हावा, यासाठी माजी आमदार अनिल राठोड व माजी खासदार दिलीप गांधी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. यासाठी स्व. अनिल राठोड यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना मुंबईत तर खा.दिलीप गांधी यांनी दिल्लीतून पाठपुरावा केला. अनेक अडथळ्याची शर्यत पार करत अखेर या पुलाचे काम सुरु झाले. परंतु ज्यांच्या प्रयत्नांनी खऱ्या अर्थाने हा उड्डाणपुल झाला, ते दोघे हयात नाहीत. परंतु खऱ्या अर्थाने ज्यांचे योगदान यासाठी आहे, त्यांचा सोयीस्कर विसर पडला आहे. त्यामुळे आम्ही शिवसैनिकांनीच या पुलाचे उद्घाटन करुन त्यांच्या कार्याची जाणिव सर्वांना करुन देण्याचा प्रयत्न केला.
विक्रम राठोड म्हणाले, राज्यात अनेक जिल्ह्यात उड्डाणपूल होत असतांना नगरमध्येही पूला व्हावा, यासाठी स्व.अनिल राठोड यांनी मोठे प्रयत्न केले. ज्यावेळी राज्यात शिवसेना- भाजपची सत्ता होती. त्यावेळी नगरमध्ये आलेल्या मंत्र्यांना नगरमध्ये उड्डाणपूल होणे किती गरजेचे आहे, हे वेळोवेळी सांगून मुंबईतही त्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर स्व.खा.दिलीप गांधी यांचेही मोठे योगदान राहिले, परंतु आता त्याचा सध्या विसर पडला आहे.
यावेळी स्व.अनिल राठोड व स्व.दिलीप गांधी यांचे फोटो असलेले फलक घेत मोठ-मोठ्या घोषणा देत कार्यकत्यांनी पूलावरील वातावरण दणाणुन सोडले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. शिवसेनेच्यावतीने पूलाची पाहणी होणार असल्याचे सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने पुलावर ठिकठिकाणी मोठ-मोठे गल्डर टाकून रस्ता बंद करण्यात आला होता.