लोणंद : भादे येथे आज नियोजित असलेला करोना लसीकरण व स्वॅब तपासणी कॅम्प तालुक्यातील काही नेत्यांनी हस्तक्षेप करून श्रेयवादातून बंद पाडल्याचा दावा ग्रामपंचायतींच्या सत्ताधारी गटातील नेत्यांनी केला आहे. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही राजकारण झाले नसल्याचे विरोधी गटाचे म्हणणे आहे.
सध्या वाढत असलेल्या करोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बाधित लोकांचे वेळीच विलगीकरण व्हावे, यासाठी भादे येथे आरोग्य विभागाच्या वतीने स्वॅब तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी शिरवळ येथून टेस्ट किट उपलब्ध न झाल्यामुळे भादे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. निलांबरी बुनगे व उपसरपंच विशाल गायकवाड यांनी अहिरे येथील आरोग्य केंद्रातून 50 टेस्ट किट उपलब्ध केले. मात्र, तरीही सर्व तयारी झालेली असूनही आरोग्य कर्मचाऱ्यांना ऐनवेळी फोन आला आणि कॅम्प सुरू ठेवण्यास वरिष्ठ पातळीवरील दबावामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी असमर्थता दर्शवली असल्याचा दावा सत्ताधारी गटाने केला.
याबाबत शिरवळ प्राथमीक आरोग्य केंद्राचे डॉ. सरोदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आज वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून हा कॅम्प उद्या सकाळी म्हणजे मंगळवारी घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर ग्रामपंचायत चांगले काम करत असताना विरोधक करोना काळातही राजकारण करत असून भादे गावच्या लोकांच्या जीवीताशी खेळ चालला आहे, असा आरोप सरपंच सौ. निलांबरी बुनगे यांनी विरोधकांवर केला. या आरोपांबाबत जिल्हा परिषद सदस्या दीपालीताई साळुंखे यांचे पती यशवंत साळुंखे यांनी “हा मला आणि माझ्या पत्नीला बदनाम करण्याचा सत्ताधारी गटाचा प्रयत्न आहे, असे सांगितले. तसेच करोना संकटाच्या काळात अशा प्रकारचे राजकारण कोणीही आणू नये, यावेळी लोकांना मदत करण्याची प्राथमिकता असली पाहिजे.
परंतु, सत्ताधाऱ्यांकडून यावरूनही राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असे त्यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्या दीपालीताई साळुंखे यांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनलचा ग्रामविकास पॅनलने धुव्वा उडवत ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली. या पराभवाचा जिल्हा परिषद सदस्या अशा प्रकारे सूड घेत आहेत, असा आरोप उपसरपंच विशाल गायकवाड यांनी केला.
भादे येथील लसीकरण व स्वॅब तपासणी प्रकरणातील एक स्थानिक नेता व वैद्यकीय अधिकारी यांची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या क्लिपमधे राजकीय नेते शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाब टाकत असल्यामुळे कर्मचारी कसे हतबल होतात, हे स्पष्ट होत असतानाच आपल्या राजकीय अधिकारांचा वापर करत करोना काळातही जनतेला संकटात टाकण्यास नेते मागेपुढे पाहत नसल्याचेच दिसून येत आहे.