नवी दिल्ली: कॉंग्रेस पक्षाने उत्तरप्रदेशातील स्थलांतरीत मजुरांना घेऊन जाण्यासाठी एक हजार मोफत बसेसची सेवा देण्याचे ठरवले आहे. पण त्या विषयी उत्तरप्रदेश सरकारकडून वेगवेळे आदेश जारी करून राजकारण केले जात असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांच्या कार्यालयातून करण्यात आला आहे. या एक हजार बसेसची कागदपत्रे लखनौला जमा करा असा आदेश उत्तरप्रदेश सरकारने कॉंग्रेसला दिला आहे हा आदेशही राजकारण करण्याचाच भाग आहे असे त्यांनी म्हटले आहे. तथापी कॉंग्रेसने ही सारी कागदपत्रे या आधीच सादर केली आहेत.
उत्तरप्रदेशातील स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी आम्हाला एक हजार बसेस चालवायच्या असून त्या बस सेवेला अनुमती द्या अशी जाहीर मागणी प्रियांका गांधी यांनी केल्यानंतर काल सोमवारी योगी सरकारने प्रियांका गांधी यांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. आता मात्र उत्तरप्रदेश सरकारने त्यांना या बसेस लखनौ मध्ये हजर करा अशी सुचना केली आहे.
या बसेसची सारी कागदपत्रे मंगळावारी दहा वाजेपर्यंत लखनौला सादर करण्यास सांगण्यात आल्याचे प्रियांका गांधी यांचे सेक्रेटरी संदीपसिंग यांनी सांगितले. त्यांनी म्हटले आहे की उत्तरप्रदेशच्या सीमेवर हजारो स्थलांतरीत मजुर पुढील प्रवासाची वाट पहात बसलेले असताना या बसेस लखनौला घेऊन जाणे म्हणजे वेळ खराब करण्यासारखे आहे. उत्तरप्रदेश सरकारची ही सुचना केवळ राजकीय हेतूची आहे त्यात व्यवहारीपणा नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
या बसेसच्या चालक व वाहकांची नावे उत्तरप्रदेश सरकारने प्रियांका गांधी यांच्याकडे मागितली ती सर्व माहिती त्यांना इमेलने पाठवण्यात आल्याचेही प्रियांकांच्या सेक्रटरींनी सांगितले. सर्व एक हजार बसेसचीही नंबरासहीत माहिती सरकारला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती सरकारला तीन दिवसांपुर्वीच देण्यात आली होती पण अजून मुख्यमंत्री ही माहिती मिळाली नाही असे सांगत आहेत हे आश्चर्यकारक आहे असेही संदीपसिंग यांनी म्हटले आहे.