Dharmaveer 2 | Anand Dighe : ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्यावर असलेल्या या चित्रपटानं लोकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर आता ‘धर्मवीर 2 ’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
चाहते ‘धर्मवीर 2’ ची आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर ही प्रतिक्षा संपली असून ‘धर्मवीर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, प्रेक्षकांनी या ट्रेलरला तुफान पसंती दिली आहे.
प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात प्रसाद ओक आणि क्षितिज दाते हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रसाद ओकने आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे.
‘धर्मवीर 2’ हा चित्रपट एकनाथ शिंदे यांचे बंड आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूचे गूढ यावर आधारित असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. धर्मवीर या सिनेमानंतर धर्मवीर 2 सिनेमाची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता होती.
येत्या 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या सिनेमात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
काल या चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ, सलमान खान, गोविंदा, निवेदिता सराफ, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर हे देखील उपस्थित होते.
यावेळी मराठी अभिनेते अशोक सराफ यांनी देखील भाषण केले. त्यावेळी त्यांनी म्हटले, “एका राजकीय क्षेत्रातील व्यक्तीवर अशा चित्रपटाची निर्मिती होऊ शकते, हे पहिल्यांदाच बघितलं.
राजकारण व अभिनय दोन वेगळी टोकं असताना देखील एक सुंदर चित्रपट बनू शकतो, हे आम्ही ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट आला तेव्हा आम्ही हे पाहिलेलं आहे. असं अशोक सराफ म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर पाहिल्यानंतर उत्सुकता वाढली आहे. आता यापुढे काय बघायला मिळणार हे निश्चित कळत नाही. हा चित्रपट वेगळी कथा दाखवेल, असं मला निश्चित वाटतं. हा सिनेमा बनविणाऱ्या लोकांचं कौतुक वाटतं.
मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी या चित्रपटाचे दोन, तीन किंवा चार कितीही भाग बनवावेत. त्यांनी ते बनवले पाहिजेत आणि लोकांपर्यंत एका नेत्याचं जीवन कसं असतं, हे पोहोचवलं पाहिजे, ते दाखवलं पाहिजे.’ असं देखील ते यावेळी म्हणाले.